Search This Blog

Wednesday, December 18, 2019

हातपाटीच्या हातावरील पोट!

हातपाटीच्या हातावरील पोट!
        दीर्घ श्वास घेऊन शिडशिडीत अंगाचा, कांती रापलेला एक मनुष्य थोड्या उथळ समुद्राचा तळ गाठतो. त्याच्या हातात दोरखंडांनी बांधलेली एक प्लास्टिक फायबरची मजबूत घमेलेवजा पाटी आहे. आपल्या ताकदीच्या बळावर तो समुद्रतळाची वाळू खरवडून घमेले भरतो. पृष्ठभागावर तरंगणाऱ्या मचव्यापासून एक काठी तळापर्यंत सोडलेली आहे. घमेले भरल्याबरोबर तो मनुष्य विशिष्ट प्रकारे काठी वाजवून आपल्या वरच्या साथीदारांना इशारा करतो. इशारा मिळताच मचव्यावरील माणसे वाळूने भरलेले घमेले वर खेचून घेतात. या वाळूसरशी पाण्याखालील व्यक्तीदेखील वर येते; पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेण्यासाठी....
बांधकामासाठी लागणारी रेती हातपाटीच्या साह्याने उपसा करणाऱ्यांची ही कथा. यालाच डुबी पद्धतीने रेती काढणे असेही म्हटले जाते. रायगड जिल्ह्यात उरण, पेण, अलिबाग पासून ते अगदी माणगाव, महाड पर्यंतच्या समुद्रकिनारी या पद्धतीने वाळू काढली जाते. केवळ समुद्रच नव्हे तर अगदी खाडी व नदीपात्रातूनही वाळू उपसा होत असतो.
        बऱ्यापैकी साठवणक्षमता असलेला मचवा (होडी), पाटी, दोरखंड, बांबू, लाकडी फळ्या आणि कुशल कामगार इतक्या मोजक्या भांडवलावर आधारीत हा व्यवसाय. इथल्या कामगारांना सरसकट खलाशी संबोधतात. तर गावाकडे त्यांना मचवेकरी या नावाने ओळखले जातात.  या मचवेकऱ्यांमध्येही कामाच्या स्वरूपानुसार काही प्रकार आहेत. हातपाटी घेऊन पाण्यात बुडी मारणारा तो ‘बुड्या’. (उरण,पनवेल परिसरात त्याचा उच्चार ‘बुऱ्या’ असा करतात.) तर वाळूने भरलेली हातपाटी ओढणारे ते ‘वढ्या’.(यांचाही उच्चार ‘वऱ्ह्या’ असा होतो!). लांब अंतरापर्यंत व अधिक काळ रेती उपसा करणाऱ्या मचव्यांवर जेवण रांधणारे ‘रांधे’ असतात. यात सर्वाधिक कौशल्याचे आणि महत्त्वाचे काम असते ‘बुड्या’चे. तो पोहण्यात तरबेज असावा लागतो. पाण्याखाली जितका अधिक काळ राहता येईल तितक्या जास्त प्रमाणात रेती उपसता येईल हे साधे गणित. याशिवाय दिवसाकाठी अधिकाधिक बुड्या होणेही गरजेचे. शास्त्रात ‘Rule of  Threes’ नावाने एक नियम प्रसिद्ध आहे. या नियमानुसार साधारणपणे एखादी निरोगी व्यक्ती जास्तीत जास्त तीन आठवडे अन्नाविना, तीन दिवस पाण्याविना आणि तीन मिनीटे हवेशिवाय जिवंत राहू शकते. अपवादात्मक परिस्थितीत किंवा सरावाने यात वाढ होऊ शकते. परंतु या परिस्थितीतही मेंदूला मोठ्या प्रमाणावर लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा देखिल यातील महत्त्वाचा घटक ठरतो.
ऑक्सिजनचा अभाव एक मिनीटांहून अधिक काळ जाणवल्यास मेंदूतील पेशी मृत व्हायला सुरूवात होते, तीन मिनीटानंतर मेंदूला गंभीर इजा होऊ शकते. तर दहा-पंधरा मिनीटानंतर मेंदू प्रत्यक्षात मृत  पावतो.  पाण्याखालील कामाचा दीर्घकालीन परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो. सतत पाण्याखाली काम केल्याने ऐकू न येणे, उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होण्याची शक्यता असते. या सर्व बाबींचा विचार करता काही आठवड्यांच्या अन्नासाठी हे सामान्य कामगार काही मिनीटे सलग पाण्याखाली राहून असामान्य काम करतात. मचव्याखाली सोडलेली काठी त्याचा जीवनाधार असते. समुद्रांतर्गत प्रवाहांमुळे वाहून जाण्यापासून या काठीमुळे आधार मिळतो. एका दमात अशा चाळीस ते पन्नास पाट्या उपसल्यानंतर त्याला अर्ध्या तासाची विश्रांती मिळते. अर्थात या जबाबदारीच्या बदल्यात मिळणाऱ्या रेतीच्या उत्पन्नातील मोठा वाटाही त्याला मिळतो. बुड्यांच्या जोडीला मेहनतीचे काम बजावणारे ‘वऱ्ह्या’ लोक कष्टाच्या दृष्टीने कठीण काम करतात. रेतीने भरलेली जड पाटी पाण्यात असेपर्यंत हलकी वाटते, परंतु पाण्याबाहेर खेचताना अधिक ताकद लावावी लागते. यासाठी मोठ्या प्रमाणावर उर्जा लागते. ही उर्जा पुरवण्यासाठी ‘रांधे’लोक काम करतात. अखेर ‘सैन्य पोटावर चालते’ या वाक्प्रचारानुसार स्वयंपाक्यांचे कामही तितकेच महत्त्वाचे ठरते.
      एकादशीच्या दरम्यान हे मचवेकरी  घरी येतात, सप्तमी-अष्टमी पर्यंत हा सुट्टी कालावधी चालतो. त्याचबरोबर होळी, गणपती यांसारख्या सणासुदीलाही ते घरी असतात. हे कामगार घरी येताना लगेच ओळखू येतात. नुकत्याच मिळालेल्या मेहनतान्याच्या पैशातून घेतलेला खाऊ आणि इतर सामानाने भरलेल्या भरगच्च पिशव्या ही त्यांची ओळख. गावात आल्यावर कधिकधी खोल विहिरींमध्ये बुडालेल्या वस्तू काढणे यांसारखी विशेष कामगिरीही ते बजावत असतात.  मचव्यावरील रांधे जेव्हा एखाद्या लग्नप्रसंगी किंवा गावच्या कार्यक्रमात स्वयंपाक करतात, तेव्हा त्यांचे सगळी मेहनत चवीच्या रुपाने जेवणात उतरते. आळीचे एकत्र जेवण बनवताना या रांध्यांनी ‘खाना’ नावाने बनवलेला स्वयंपाक विलक्षण असतो.
    यांत्रिकीकरणाची झळ या व्यवसायालाही बसलीय. ड्रेजर मशिन आणि सक्शन पंपाच्या अश्वशक्तीपुढे बुड्याची छाती कमी पडू लागली. पारंपरिक पद्धतीने गरजेपुरता होणारा वाळू उपसा अधाशीपणे होऊ लागला.
त्यातच विनापरवाना चालणाऱ्या छुप्या रेती उपशामुळे पारंपरिक कामगारांनाही चांगला माल मिळणे कठीण झाले. आधीच तळाशी असणाऱ्या पारंपरिक हातपाटी वाळू व्यवसायावर मंदीचे सावट आले. रायगडच्या समुद्रकिनारी अजूनही बुड्यांचा श्वास घुमतोय. अवैधपणे चालणाऱ्या वाळू उपशावर नियंत्रण राखल्यास निसर्गाशी समन्वय राखत चालणाऱ्या या व्यवसायालाही थोडा आधार मिळेल, मचव्यातील काठीसारखा...

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

No comments:

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...