Search This Blog

Friday, March 4, 2022

काष्ठशिल्प: जय-विजयचे

 

                नेहमीच्या पाहण्यातल्या गोष्टी जेव्हा आपण नव्या संदर्भाने पाहतो तेव्हा त्यातील वेगळेपणा लगेच नजरेत भरतो. गतकालीन इतिहासाचा शोध घेत असताना हे वारंवार घडते. शिलाहार काळाचा संदर्भ असलेल्या पिरकोनच्या शिवमंदिर परीसरात इतिहासातील अज्ञात पाने याच दृष्टीकोनामुळे सातत्याने प्रकाशात येत आहेत. आतापर्यंत मंदिरालगतचे विरगळ, सतीशिळा, गजलक्ष्मी, पुरातन शिवलिंग, नंदी यांबाबतचे लेखन सर्वांसमोर आले आहे. आता येथील एक लहानशी कलाकृती मंदिराभोवतीचे कुतूहल वाढवणारी ठरू शकते. ही कलाकृती एक ‘काष्ठशिल्प’ (लाकडी शिल्प) आहे. सद्यस्थितीत हे शिल्प मंदिरातील एका खिडकीत विराजमान आहेत. या काष्ठशिल्पांचे पुराणकाळातील संदर्भ ताडून पाहिल्यानंतर त्यांचा संबंध थेट हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपु, रावण, कुंभकर्णापर्यंत जाऊन पोहोचतो.

पुराणांत वर्णीलेल्या इतक्या महत्त्वपूर्ण व सुपरिचित व्यक्तीमत्त्वांशी संबंधित असलेले हे काष्ठशिल्प आहे तरी काय?

शंकर-विष्णू देवस्थान’ म्हणून नामोल्लेख असलेल्या या मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोर भगवान विष्णूची संगमरवरातील एक आधुनिक मूर्ती आहे. या मूर्तीच्या मागील बाजूच्या खिडकीवर दोन लहान आकाराचे लाकडी द्वारपाल आधाराने उभे केलेले दिसतात. कित्येक वर्षे जुन्या असलेल्या या कलाकृतीवर नव्याने रंगरंगोटी करून त्यांना सजवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. ही दोन्ही शिल्पे जिर्णोद्धारापूर्वीच्या मंदिर प्रवेशद्वारावर होती. आजूबाजूला विखुरललले दगडी अवशेष पाहता मूळ मंदिर हे भूमिज शैलीतले असावे. (भूमिज शैली म्हणजे सध्या ‘हेमाडपंती’ या चुकीच्या नावाने प्रसिद्ध असलेली शैली.) त्यानंतर झालेल्या स्थित्यंतरामध्ये मंदिर रचनेत अनेक बदल झाले. यातूनच खालचा भाग दगडी आणि वरचा भाग लाकडी अशी रचना तयार झाली. बहुधा याच काळात हे द्वारपालांचे काष्ठशिल्प तयार झाले असावे. हे द्वारपाल म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान विष्णूच्या दारावरील ‘जय व विजय’ आहेत. या दोघांची कथा त्यांच्या अंगावरील रंगांपेक्षाही अधिक रंगतदार आहे.श्रीमद्भागवत पुराणातील तिसऱ्या स्कंधाच्या पंधराव्या अध्यायात ही कथा वाचायला मिळते.


   “या कथेत सनकादी ऋषींचे वर्णन येते. हे सनकादी ऋषी म्हणजे सनक,सनंदन,सनातन आणि सनत्कुमार नावाचे चार ऋषी. सृष्टीकर्ता ब्रह्माचे मानसपुत्र असल्याने त्यांचा सर्वत्र मुक्त संचार असायचा. या ऋषींच्या तपोबलामुळे अधिक वय असूनदेखील त्यांना बालक रुप लाभले होते. एकदा सनकादी ऋषींना भगवान विष्णूचे दर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली. दर्शनासाठी बालकरुपातील  सनकादी ऋषी वैकुंठधामात पोहोचले. तिथे आपले जय-विजय नावाचे द्वारपाल वैकुंठाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करत होते. लहान बालकांच्या मूळ रुपाचा परिचय नसल्याने या द्वारपालांनी त्यांना अडवले व त्यांची चेष्टा केली. या प्रकाराचा राग येऊन त्यांनी जय-विजय यांना पृथ्वीवर मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला. थोड्या वेळाने भगवान विष्णू तिथे पोहोचले. त्यांनी सनकादी ऋषींची ओळख द्वारपालांना दिली. भयभीत होऊन जय-विजय या द्वारपालांनी ऋषींची क्षमा मागीतली. भगवान विष्णूकडे त्यांनी मुक्ती मागीतली. अखेर ऋषींनी प्रसन्न होऊन ‘जय विजय यांना मृत्यूलोकात तीन वेळा जन्म घेऊन, श्रीहरींकडूनच मुक्ती मिळेल असा उ:शाप दिला.’ पुढे या वैकुंठाच्या द्वारपालांनी हिरण्याक्ष व हिरण्यकष्यपू या  दैत्यरुपाने जन्म घेतला.

त्यांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने अनुक्रमे वराह व नरसिंह अवतार घेतला.पुढे ही कथा रामायणाशी जोडली जाऊन या दोघांनी रावण व कुंभकर्ण रुपाने जन्म घेतला. त्यांचा विनाश प्रभू श्रीरामाने केला. जय-विजय यांचा तिसरा व अखेरचा जन्म द्वापारयुगात झाला. 

शिशुपाल व दंतवक्र रुपातील या दोघांना भगवान श्रीकृष्णाने मुक्त केले. अखेर आपला शाप पूर्ण करून जय-विजय पुन्हा एकदा वैकुंठधामी सेवेस रुजू झाले.”

वैविध्यपूर्ण आणि सुरस कथांनी भरलेल्या, कधी सुसंगत तर कधी अगदीच विसंगत वाटणाऱ्या विस्मयकारक पुराणकथांकडे मूर्तीकारांचे व त्यांच्या राज्यकर्त्यांचे लक्ष जाणे स्वाभाविकच होते. यातूनच अनेक शिल्पांची निर्मिती झाली. अशाच एका निर्जीव काष्ठशिल्पाची ही  जन्मकथा. वैकुंठातील त्या प्रसंगानंतर जय-विजय यांना सनकादी ऋषींनी दिलेला शाप द्वापारयुगात संपला असला तरी त्यांच्या मूर्त्यांना लाभलेला ‘दुर्लक्षाचा शाप’ कलीयुगातही चालू आहे.


हा शाप त्यांच्यापुरता मर्यादित नसून, ऐतिहासिक वास्तूंनाही या शापाची झळ पोहोचत आहे. उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या इतिहासाकडे आपण डोळे उघडे ठेवून पहायला हवे. या शिल्पाला, आपल्या परिसराच्या इतिहासाला उ:शाप मिळावा यासाठीचाच हा एक लहानसा लेखन प्रयत्न.


-- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...