Search This Blog

Tuesday, September 25, 2018

समुद्रातील दगडी चाळ

समुद्रातील दगडी चाळ

माशांच्या विविध प्रजाती पहायच्या असतील तर मत्स्यालयात तरी जायचं नाहीतर थेट मासळी बाजारात! दोन्ही ठिकाणी फेरफटका मारताना विविध प्रकारचे मासे पहायला मिळतात. फरक इतकाच की मत्स्यालयातल्या माशांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी डोळ्यांचा वापर होतो, तर फिश मार्केटमधील माशांची अनुभूती खवय्यांच्या जीभेने घेतली जाते. येथे कोणता जीव कसा दिसतो या पेक्षा चवीला कसा लागतो यावरच त्यांचे महत्त्व ठरते.  रायगड, मुंबई किंवा पालघरच्या अशाच मासळी बाजारात फिरताना कधी कधी एक वेगळेच दृश्य पहायला मिळते. नेहमीच्या माशांच्या जोडीला मत्स्यविक्रेत्यांकडे काही ओबडधोबड आकाराचे दगड टोपलीत विकायला ठेवलेले असतात. नवख्या व्यक्तीला संभ्रमात पाडणारे हे दृश्य.
मासळी बाजारात यांचं काय काम?
काय असतं या दगडांमध्ये?

      निर्जीव दगडासारखे भासणारे, पण जीवंत असणारे हे जीव म्हणजे ‘कालवे’, शिंपल्यांची एक जात. इंग्रजीत यांना ऑइस्टर्स (Oysters) म्हणून ओळखले जाते. मृदूकाय आणि कवचधारी वर्गातील हे सजीव. संपूर्ण जगातील मांसाहारी लोक यांना चवीने ओळखत असले तरी त्यापलीकडेही त्यांची एक ओळख आहे. ही ओळख समोर यावी हाच या लेखाचा उद्देश आहे. सामान्यत: हे कालवे समुद्र किनाऱ्यावरील दगड किंवा तत्सम कठीण पृष्ठभागावर मोठ्या संख्येने आढळतात. या प्राण्यांची ती एक प्रकारची ‘दगडी चाळ’च. एकदा या प्राण्यांना किनाऱ्यावर भक्कम आधार मिळाला की बाहेरच्या कारणांमुळे काही परिणाम होईपर्यंत आयुष्यभर हे तिथेच राहतात.  हा कालावधी वीस वर्षाइतका प्रदीर्घही असू शकतो. या चाळीत बंदिस्तपणे राहूनही आपले जीवन व्यवस्थितपणे जगतात. (आधार मिळाला की त्याच जागी  चिकटून आयुष्य घालवण्याचा कालव्यांचा गुण अलिकडे मनुष्य प्राण्याने स्विकारला आहे. आधार तुटेपर्यंत किंवा दुसऱ्याने धक्का देईपर्यंत माणूसदेखिल ती जागा सोडेनासा झालाय.) कॅल्शिअमने बनलेल्या बाहेरच्या कठीण आणि खडबडीत कवचाआड एक मृदू शरीराचा जीव या आधाराभोवतीच आपली पकड अधिकाधिक घट्ट करत जातो. कवचरूपातील शरीराचा एक भाग या दगडाला धरून राहतो. ही पकड इतकी एकजीव होते की मूळ दगड आणि त्यावरील कालवे सहजासहजी वेगळे करता येत नाहीत. तर कवचाच्या दुसऱ्या भागाची तोंडाप्रमाणे उघडझाप करता येते. पुराणातल्या कथांमध्ये एकाच जागी राहून खडतर तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींची आठवण करून देणारे हे जीव. दीर्घकाळ चालणाऱ्या तपामुळे ऋषींच्या अंगावर वारूळ तयार झाल्याचा उल्लेख या कथांमधून येतो असंच काहीसं कालव्यांच्या बाबतीतही घडतं. वर्षानुवर्षे एकाच जागी राहून शैवाल आणि इतर पदार्थांनी ते ओळखू न येण्याइतपत झाकले जातात.

    दगडी चाळीतल्या या कालव्यांचेच एक परदेशी भाईबंद खारफुटींच्या जंगलातही आढळतात. नेहमीसारखं भक्कम आधाराने वाढण्याऐवजी, इथले जीव मात्र खारफुटींच्या बुंध्याला चिकटून वाढतात. भरती ओहोटीच्या चक्रामुळे कांदळवनांतील स्थिती सातत्याने आणि वेगाने बदलत असते. सभोवतालच्या या बदलांमुळे खारफुटीच्या मुळांना धरून असलेले हे शिंपले ओहोटीच्या वेळेस अक्षरश: उघड्यावर येतात. कॅरेबियन बेटांवरील अशाच कालव्यांना पाहून काही पर्यटकांनी हे शिंपले खारफुटींच्या मुळांवर उगवतात अशी नोंद केली होती. यातला गंमतीचा भाग वगळला तरी कालव्यांचे हे दृश्य चक्रावणारेच असते.
     ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ हे विधान प्रत्यक्षात खरे करणाऱ्या कालव्यांना त्यांच्या दगडी खाटल्यावरच अन्न उपलब्ध होते. यांचा हरी म्हणजे समुद्र. आपल्या तोंडाच्या साह्याने समुद्राचे पाणी  गाळून त्यातील अन्नकण वेचण्याचे काम हे जीव सातत्याने करतात. अन्नग्रहण आणि श्वसनाच्या निमित्ताने दिवसभरामध्ये तब्बल दिडशे लिटरहून अधिक पाणी गाळले जाते. या पाणी गाळण्याच्या प्रक्रीयेत नायट्रोजनयुक्त अन्नपदार्थांचे पचन होऊन उर्वरीत भागाचे उत्सर्जन होते. पुढे या उत्सर्गाचे विघटन होऊन त्यातील नायट्रोजन मुक्त होतो. अशा पद्धतीने एका दगडी चाळीतील कालव्यांद्वारे लाखो लीटर पाण्यावर गाळण प्रक्रीया होऊन जलशुद्धीकरणाची प्रक्रीया अखंडपणे चालू राहते. थोडक्यात कालव्यांच्या या दगडी चाळी एक प्रकारच्या नैसर्गिक वॉटरप्युरिफायरच काम करतात.

        निसर्गाच्या साखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या प्राण्याचे पुनरूत्पादन विशिष्ट तापमानावर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्यात नदी, नाल्यांद्वारे मानवनिर्मित रासायनिक कचरा, किरणोत्सारी पदार्थ मिसळते जातात. यातून पाण्याच्या तापमानातही सूक्ष्म बदल होत असतात. या सूक्ष्म बदलांमुळे सागरी जैवसंस्थेवर मोठे परिणाम होतात. वाढते जलप्रदूषण आणि वातावरणात होणारे लक्षणीय बदल यांचा तडाखा या समुद्रकिनाऱ्यावरील जीवांनाही बसलाय. मनुष्याच्या दृष्टीने एक चविष्ट अन्न असल्याचा कालव्यांचा गुणही त्यांच्या अस्तित्वासाठी शाप ठरतोय. वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे जशा मुंबईतल्या चाळी नष्ट झाल्या, तशाच या समुद्रातील दगडी चाळीही नष्ट होऊ लागल्यात. कालव्यांचे समुद्रात असणे, गरजेचे आहे- समुद्रासाठी, समुद्रातील जीवांसाठी आणि पर्यायाने निसर्गासाठी.  दगडी चाळींसारख्या कित्येक वसाहती या पृथ्वीवर आहेत, त्यांचे महत्त्व ओळखून वेळीच संवर्धनासाठी पाऊल उचलले पाहीजे. समुद्र आणि मनुष्य यांची संघर्षरेषा म्हणजे हे ‘सागर किनारे’ आहेत. या किनाऱ्यांना जपायलाच हवे!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(वरील लेख दैनिक सकाळ- 25 सप्टेंबर 2018 च्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित झाला आहे.)

Tuesday, September 18, 2018

बिळातला शहेनशाह!

‘बिळातला शहेनशाह’


“अंधेरी रातोंमे सुनसान राहोपर...” हे गीत पार्श्वभूमीला वाजत असताना, एका लयबद्ध चालीने जाणारा बॉलीवूडचा ‘शहेनशाह’ सर्वांनाच आठवत असेल. दिवसा एका सामान्य पोलीसाच्या भूमिकेत वावरणारा अमिताभ रात्र होताच शहेनशाहच्या वेशात जाऊन लोकांची मदत वगैरे करतो, असे काहीसे कथानक या चित्रपटाचे आहे. या  चित्रपटाचा उल्लेख झाल्यावर पहील्यांदा आठवते ती अमिताभ बच्चन यांची वेशभूषा. जवळपास अठरा किलो वजनाचे कपडे (Costume), त्यापैकी सुमारे पंधरा किलो वजन निव्वळ हाताचं! एक हात वजनदार ,तर दुसरा सामान्य. विविध प्रकारच्या अॅक्शन दृश्यांसाठी या वजनदार, मजबूत आणि संरक्षक असणाऱ्या हाताचा दिग्दर्शकाने मुक्तहस्ते(!) वापर केल्याचे दिसून येते.
          या शहेनशाहसारखाच आणखी एक शहेनशाह आहे, ‘सुनसान राहोंपर’ चालणारा... आपल्याला फारसा परिचित नसणारा... तो देखिल दिवसा लपून राहतो आणि सहसा रात्रीच बाहेर पडतो...

 सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा एक हातही ‘शहेनशाह’ सारखाच आहे- वजनदार, मजबूत आणि संरक्षक! समुद्रकिनाऱ्यावरील या ‘बिळातल्या शहेनशाह’चं स्थानिक नाव आहे ‘आंगडा’. अतिशय आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण पंजामुळे या खेकड्याला हे नाव मिळाले आहे. हा खेकडा इंग्रजीत फिडलर क्रॅब (Fiddler Crab) म्हणून ओळखला जातो.  मुंबई आणि कोकणच्या समुद्रकिनारी या खेकड्याच्या तीन-चार प्रजाती आढळतात.
  यापैकी युका अॅन्युलाईप्स (Uca Aannulipes), युका व्होकन्स (Uca Vocans) आणि युका डुस्सुमेरी (Uca Dussumieri) या सर्वाधिक आढळणाऱ्या प्रजाती आहेत. समुद्रकिनाऱ्यालगतच्या दलदलयुक्त प्रदेशात याचे वास्तव्य असते. भरती-ओहोटीमुळे सतत बदलणारा परिसर आणि भोवतालचे कांदळवन म्हणजे या  प्राण्याचे नंदनवनच. हे खेकडे तसे मेहनती असतात, दलदलीच्या प्रदेशात स्वत:ची स्वतंत्र बिळे तयार करून राहतात. मुंबईत जशी माणसं राहतात, तशीच लहानशा वसाहतीत हे हजारो खेकडे दाटीवाटीने राहतात. शैवाल आणि इतर सेंद्रीय पदार्थ हे त्यांचे अन्न. मग अन्न मिळवण्यासाठी हे खेकडे शक्यतो आपल्या बिळाच्या परिसरातच शोध घेतात. शत्रूने हल्ला केलाच तर सहजतेने लपता यावे यासाठी फार दूरपर्यंत अन्नाचा शोध ते घेत नाहीत.  बिळाच्या आसपास मिळणाऱ्या अन्नावरच ते अवलंबून राहतात. या आंगड्यांची खाण्याची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. मातीत मिसळलेले सेंद्रीय रुपातील अन्नकण मिळवण्यासाठी हे खेकडे आपल्या लहान पंजाच्या साह्याने चक्क माती खातात. (एखाद्याने माती खाल्ली हे विधान आता सकारात्मक दृष्टीने घ्यायला हरकत नाही.) एका अर्थी या खेकड्याचे ‘खायचे हात आणि दाखवायचे हात’ वेगळे असतात.
 गुंतागुंतीची रचना असलेल्या तोंडाने  मातीतील अन्नाचे कण वेचून उर्वरीत माती लहान गोळ्यांच्या स्वरूपात बाहेर टाकतात.ओहोटीच्या वेळेस अशा लहान लहान गोळ्यांची सुंदर नक्षी बिळाबाहेर पहायला मिळते. राजहंसाच्या ‘निर-क्षीर’ वेगळे करण्याच्या कथित कौशल्याबद्दल पुष्कळदा लिहले जाते, पण मातीतून अन्न वेचणारा हा शहेनशाह अजूनही तसा दुर्लक्षितच म्हणावा लागेल. नर खेकडा आणि मादी खेकडा यांच्या शरीर रचनेतही महत्त्वपूर्ण फरक आहे. संपूर्ण शरीर झाकू शकेल असा भला मोठा पंजायुक्त हात मादी खेकड्याला नसतो, त्यांचे दोन्ही पंजे लहानच असतात. वरकरणी पाहता मोठा पंजा म्हणजे नर खेकड्याला एखादे वरदान मिळाल्यासारखे वाटेल, परंतु अन्न मिळवण्यासाठी लहान पंजाचा वापर होत असल्याने त्याला केवळ एकच पंजाचा वापर करता येतो. याऊलट मादी खेकड्याला दोन खायचे हात असल्याने त्यांचा खाण्याचा वेग नरांच्या तुलनेत दुप्पट असतो. त्यामुळे मादी खेकड्यांचा तोंडाचा पट्टा नरांच्या तुलनेत दुपटीने चालतो. अर्थात हे सर्व खाण्याच्या बाबतीत असते.

      जगण्यासाठीचा संघर्ष या लहान जीवांच्या जगात नेहमीचाच आहे. अत्यंत कमी जागेत कित्येक बिळे दाटीवाटीने सामावलेली असतात. एखादा दुसरा ‘आंगडा’ जागा बळकावण्यासाठी आला तर मोठी लढाई होते, पराभूताला आपला बिळावरचा हक्क सोडून नव्याने सुरूवात करावी लागते. स्वत:च्या घरासाठी सतत संघर्ष करणारे नर खेकडे मिलनाच्या वेळेस मात्र आपल्या घराचा त्याग करून काही काळ मादीसह नविन घरात राहतात.
     मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई आणि महामुंबईकडे पाहीले जाते. या प्रदेशातील वाढत्या लोकवस्तीला सामावून घेण्यासाठी समुद्रकिनाऱ्यालगतच्या पानथळ जागांवर भराव टाकणे, खारफुटीची जंगले न‍ष्ट करणे या कारणांमुळे सुंदर अशा ‘आंगड्यांच्या’ राहण्याच्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. बिळातून बाहेर पडल्यानंतर परत येईपर्यंत त्याचे बिळ सुस्थितीत आहे किंवा नाही याची खात्री नाही. फ्लॅटरूपी बिळात राहणाऱ्या माणसांसाठी या शहेनशाहला आपल्या बिळाचा त्याग करावा लागतोय.  परिणामी त्यांचा आढळही कमी झालाय.बिळातला हा शहेनशाह आपल्या स्वत:च्या राज्यासाठी झगडतोय.
स्वत:च्या बिळासाठी लढा देणाऱ्या या खेकड्यांनी मानवाच्या आक्रमणापुढे शब्दश: नांगी टाकलीय.  जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या या खेकड्यांचं अस्तित्व हे निसर्गचक्राच्या सुरळीतपणाचा पुरावा आहे. परंतु त्यांचा आढळ कमी होणे ही नांदी आहे, मानवाने ओढवलेल्या विनाशपर्वाची. या आंगड्यांसारख्या असंख्य जीवांना वाचवायचे असेल तर आत्ताच प्रयत्न करायला हवा. वेळ अजूनही गेलेली नाही, प्रयत्न करूया!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

#आंगडा #शहेनशाह #तुषारकी #fiddlercrab #shahenshah #tusharki

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...