Search This Blog

Thursday, July 27, 2023

सावित्री समजून घेताना


सावित्री समजून घेताना
(मुंबई सकाळ, रायगड टुडे 27 जुलै 2019)

    तब्बल चौदाशे मीटर उंचीवरून ती येते. येते कसली?कोसळतेच! महाबळेश्वर येथील ‘क्षेत्र महाबळेश्वर’ मंदिरातून ज्या पाच नद्यांचा उगम होत असल्याचे मानले जाते.
ती यापैकीच एक. कृष्णा, वेण्णा, कोयना या तिच्या इतर मैत्रिणी वेगळ्या दिशेने वळत असताना, ती मात्र गायत्री या सवतीसंगे दुसरीकडेच तोंड वळवते. तिचा या सवतीसोबतचा संसारही फार काळ चालत नाही.  महाबळेश्वरच्या आर्थर सीट या ‘सनराईझ’ पॉईंटजवळ सुरू झालेला हा प्रवास बाणकोटच्या ‘सनसेट’ स्थळी येऊन थांबतो. आर्थरच्या दु:खद आठवणींशी जोडलेल्या या माऊलीचे नाव ‘सावित्री’.

‘आर्थर सीट’ मधील आर्थर हा अठराव्या शतकात पुणे दरबारातील रेसिडेंट पदावर असणाऱ्या सर चार्ल्स मॅलेट या अधिकाऱ्याचा मुलगा. मुंबईहून महाबळेश्वरला जाण्यासाठी त्याने मुंबई ते बाणकोट या जलमार्गाची निवड केली. या प्रवासात आर्थर सोबत त्याची पत्नी सोफीया आणि एक महीन्याची मुलगी एलेन होती. या प्रवासादरम्यान आलेल्या वादळाने बोटीवरील १३ खलाशांसह सोफीया आणि चिमुकल्या एलेनचा करूण अंत झाला. बाणकोट येथील हिंमतगडाच्या खालच्या बाजूला मायलेकींना दफन करण्यात आले. त्यांची स्मृती सांगणारा संगमरवरी फलकही तिथे आहे. या दोघींच्या आठवणीने व्याकूळ आर्थर नेहमीच उंच अशा कड्यापाशी बसून नदीच्या प्रवाहाकडे टक लावून पहात असे. मढीमहाल नावाची ही जागा पुढे ‘आर्थर सीट’ म्हणून ओळखली जाऊ लागली. सावित्रीच्या या कटू आठवणी इतक्यावरच थांबत नाहीत.
तीन वर्षापूर्वी जुन्या ब्रिटीशकालीन पुलाला क्षणात नाहीसे करणारे तीचे रौद्र रुप कोण विसरेल? ‘सव्वीस जुलै’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापुरात तर या माऊलीने सर्वांनाच आपल्या पदरात झाकले होते. पोलादपूर मधील सिद्धेश्वर शिव मंदिरातील दगडी नंदीसह, तालुका वाचनालय, एक कॉलेज, काठावरची घरे, भलेमोठे वृक्ष आणि काही पुलांचे खांब या सर्वांनाच सावित्रीने आपल्या पोटात घेतले होते. सावित्रीच्या या रौद्र रुपाची पुराण कथाही तिचा स्वभाव स्पष्ट करणारी आहे.
        सृष्टीचा निर्माता मानल्या जाणाऱ्या ब्रम्हाच्या पहिल्या पत्नीचे नाव सावित्री. एकदा ब्रम्हदेवाला यज्ञ करायचा होता. यावेळेस देवी सावित्री तिथे उपस्थित नव्हती.
यज्ञाचा मुहूर्त टळू लागला होता. त्यामुळे ब्रम्हदेवाने गायत्रीशी विवाह करून यज्ञाला सुरूवात केली. थोड्या वेळाने सावित्री यज्ञस्थळी पोहोचली. ब्रम्हदेवांच्या शेजारी गायत्रीला पाहून तिचा संताप झाला. तिने “पृथ्वीवर तुमची कुठेही पूजा होणार नाही!”  असा शाप दिला व रागाने निघून आली. रागावलेली, देवावर रुसलेली ही सावित्री नदी रुपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाली. पुढे राग शांत झाल्यावर पुष्कर येथील मंदिरात तुमची पूजा होईल असा उ:शाप देवाला दिला.
याकडे केवळ एक पुराणकथा म्हणून पाहीले तरीही यातून सावित्री नदीचे वर्णन समोर येते.  तसे पहायला गेलो तर ती केवळ महाराष्ट्रातील एक नदी. पण एका जिल्ह्यातून सुरूवात करून दुसऱ्या जिल्ह्यात येताना तिचे भौगोलिक आणि सांस्कृतिक रुपही पालटत जाते. महाबळेश्वरच्या सावित्री कड्यावरून झेपावणारा नदी प्रवाह पाहील्यानंतर यज्ञप्रसंगी रागाने निघून येणाऱ्या सावित्री देवीची नक्कीच आठवण येते. डोंगरदऱ्यांतून ती ज्या वेगाने येते ते पाहून निसर्ग शक्तीची जाणीव होत राहते. पुढे हा वेगवान प्रवाह पोलादपूरच्या दिशेने येतो.
निसर्गापुढे आपण किती क्षुद्र आहोत हे अनुभवायचे असेल तर एकदा सावित्रीचा जलप्रपात घागरकोंडच्या झुलत्या पुलावरून पहा. ‘जीवनाची सुंदरता आणि मृत्यूची भिती’ या दोन्हींचा संगम या ठिकाणी पहायला मिळतो. पुढे रानबाजीरे धरणामुळे या प्रवाहाला थोडा अटकाव होतो.
मुळची पश्चिमवाहीनी सावित्री पोलादपूरपासून काही काळ उत्तरवाहीनी  होते. महाडच्या पूर्वेला तीला काळ नावाची नदी येऊन मिळते. कालांतराने गांधारी नावाची उपनदीही त्यात सामावते. पोलादपूरपासून राजेवाडीपर्यंत नदीचे खोरे रूंद होऊन तीचा वेग मंदावतो. इथून पुढे राग शांत झालेल्या सावित्रीचे दर्शन घडते. भरती-ओहोटीचा परिणाम तीच्या प्रवाहावर होऊ लागतो. हा प्रवास  पोलादपूर, महाड, माणगाव आणि श्रीवर्धन तालुक्यांमधून होऊन पुढे ती हरिहरेश्वर जवळून अरबी समुद्राला मिळते.  संथ प्रवाह असलेल्या सावित्रीच्या तीरांवर थोडीफार लागवडयोग्य जमिन आहे. या जमिनीवर पावसाळ्यासह इतर काळातही शेती करता येते.  प्राचिन काळापासून सावित्रीस व्यापारी महत्त्व होते. कालांतराने मुखाजवळ गाळ साठल्याने या नदीतून होणारी जलवाहतूक कमी झाली. तरीही बाणकोटपासून दासगाव पर्यंत यांत्रिक होड्यांतून जलवाहतूक होत असते. रानबाजिरे धरणामुळे उन्हाळ्याच्या दिवसांतही नदीचा प्रवाह जीवंत ठेवण्यात यश मिळाले आहे.
अजूनही या पाण्याचा मानवी उपयोग वगळता कृषी क्षेत्रासाठी फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होताना दिसत नाही. तुर्भे-लोहारमाळ परिसरातील सावित्री नदीवर असलेलेया जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांमुळे पाणी अडवण्याचा प्रयत्न होतो. पण या माऊलीच्या प्रकोपापुढे या बंधाऱ्यांनीही मान तुकवली आहे. डोंगराळ भागातून वाहताना सावित्रीच्या तीरांवर फार मोठी लोकवस्ती आढळत नाही, मात्र पोलादपूर, महाड तालुक्यांत बऱ्यापैकी लोकवस्ती आहे. असे असूनही इतर नद्यांच्या तुलनेने सावित्री नदी स्वच्छ आहे. सहसा इथले लोक या प्रवाहात कचरा टाकत नाहीत.  या प्रवाहाने एका शिस्तबद्ध लोकसंस्कृतीला जन्म दिला आहे. ही संस्कृती पाण्याचा आदर करते. नदीला आई मानणारे इथले रायगडवासी आपल्या आईचा राग सहन करतात आणि तीला जपतातही!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Thursday, July 13, 2023

रायगडचे ‘हेन्री-केन्री’

रायगडच्या हेन्री-केन्रीची साद ऐका!

“खांदेरी-उंदेरी या दोघीजणी जावा,
     मधीन कुलाबा तो कैसा झेलतंय हवा...”
      रायगड जिल्ह्यातील अलिबागसमोरील खोल समुद्रात असलेल्या खांदेरी- उंदेरी या दोन बेटांचे वर्णन करणारे हे गीत. दोन बेटांमधील नाते हे गीत स्पष्ट करते. मुंबई बंदराच्या दक्षिणेस सुमारे १७ कि.मी. वर व मुख्य भूमीपासून सुमारे चार कि.मी. वर असणारी ही बेटे. समकालीन इंग्रजी कागदपत्रांमध्ये हेन्री केन्री (Hendry Kendry किंवा Henry Kenry) असे नामोल्लेख असलेली ही ठिकाणे अभ्यासकांना नेहमीच खुणावत असतात.  परंतु ही बेटे व त्यावरील किल्ले पाहणे मात्र सहज शक्य नसते.
 उंदेरी बेटावर फारसे कोणी फिरकत नाहीत. तर खांदेरी बेट केंद्र सरकारच्या तटरक्षक दलाच्या अखत्यारीत असल्याने सामान्यजनांना ते सहज उपलब्ध नाही.  शिवकालीन जलदुर्गांपैकी एक असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी थळ या गावातून एखादी बोट ठरवून जाता येते. बोटीने निघाल्यास समुद्रात डावीकडे दीपगृह असलेली उंच टेकडी दिसते. हे खांदेरी बेट. त्याच्या उजवीकडे किरकोळ उंचीचे छोटे बेट म्हणजे उंदेरी.
खांदेरीत प्रवेश करताना सुरुवातीलाच ‘कान्होजी आंग्रे द्वीप’ अशी मोठी पाटी दिसते. चढण असलेल्या खडकावरून पायी चालत गेल्यावर वेताळदेव मंदिरात पोहोचता येते. शेंदूरचर्चित वेताळदेव हा इथल्या मच्छीमार कोळ्यांचे दैवत. ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’च्या ताब्यातील बेटावरील या ब्रिटिशकालीन दीपगृहाला कान्होजी आंग्रे यांचे नाव देण्यात आले आहे. हे संरक्षित क्षेत्र असल्याने दीपगृह आतून पाहता येत नाही.खांदेरीवरून उंदेरीला  बोटीने जावे लागते. पण इथल्या बेटाला धक्का नाही. यामुळे बेटावर उतरताना काळजीपूर्वक उतरावे लागते. नाही म्हणायला उंदेरीच्या ईशान्य टोकापाशी नौका नांगरता येण्याजोगी थोडी जागा आहे; बाकी भोवताली खडक आहेत. उंदेरीवरील किल्ल्याचे प्रवेशद्वार थोडे लहानच आहे. खांदेरीच्या मानाने हे बेट खूपच लहान आहे. त्याच्या मध्यभागी पठारासारखे सपाट मैदान दिसते. त्यावर अनेक इमारतींचे भुईसपाट झालेले अवशेष शिल्लक राहिलेले दिसतात. बेटावरून चहूबाजूला विशाल समुद्र दिसत राहतो. किल्ल्याच्या खालच्या अंगाला एक दुहेरी तटबंदी आहे. या तटबंदीला छोटे बुरुज असून, अखेरच्या बुरुजावर तीन तोफाही आहेत. त्याचबरोबर सुरुवातीच्या बुरुजावरही एक तोफ आहे.
 सध्या विस्मृतीत गेलेल्या या बेटांचे महत्त्व ब्रिटीशांच्या मुंबई कौन्सिलने सुरत कौन्सिलला पाठवलेल्या एका पत्रावरून लक्षात येईल.
    या पत्रात ते लिहितात  की,
    “हे (बेट) अशा ठिकाणी आहे की जर आपण कोणाला तिथे किल्ला बांधू दिला तर ते चालू देतील त्यापेक्षा अधिक व्यापार या (मुंबई) बेटावर होण्याची आशाच आपण ठेवता कामा नये.”

      थोडक्यात मुंबईपासून ते रायगड किनारपट्टीने चालणाऱ्या सागरी व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचे काम या बेटाद्वारे होऊ शकते.  यामुळेच इसवी सन १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचा पहिला प्रयत्न केला, परंतु बहुधा पाण्याच्या तुटवड्यामुळे, त्यांना तो सोडून द्यावा लागला. यानंतर १६७९ मध्ये महाराजांनी थेट पावसाळ्यातच किल्ला बांधणीस सुरूवात केली. यासाठी मायनाक भंडारी १५० माणसे व चार छोट्या तोफा यांसह बेटावर दाखल झाला.   ही बातमी इंग्रजांना त्यांच्या पोर्तुगीज व हिंदू खबऱ्यांकडून समजली. इंग्रजांकडून ही बातमी ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरत कौन्सिलला कळविण्यात आली.
     पुढे सुरत कौन्सिलने प्रत्युतरात पाठवलेल्या पत्रात म्हटले की,
  “गेल्या ऑगस्टमध्ये शिवाजीने तिथे किल्ला बांधण्याकरिता शेकडो माणसांची विविध प्रकारच्या साहित्यासह नेमणूक केली. हा बेत त्याने इतक्या त्वरेने व गुप्ततेने अमलात आणला की त्याची दखल घेतली जाण्यापूर्वी त्याने अनेक ठिकाणी छातीइतक्या उंच भिंती आपल्या माणसांच्या रक्षणाकरिता बांधल्या होत्या आणि काही लहान तोफाही लावल्या होत्या.”
       या पत्रावरून महाराजांनी मुत्सदीगिरीने केलेल्या किल्ला बांधणीच्या कामाची कल्पना येते. खांदेरी बेटावर किल्ला उभारण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवाजी महाराजांनी एकाच वेळेस तीन शत्रूंची नाराजी ओढवून घेतली. मुंबई परिसरातील समुद्रावर हक्क सांगणारे इंग्रज, महाराजांसोबत तात्पुरता समझोता असलेले पोर्तुगिज आणि पश्चिम सागरावर सत्ता स्थापण्याची महत्त्वकांक्षा असणारा सिद्धी या तिघांच्याही डोळ्यांत महाराजांचे प्रयत्न खुपू लागले. परंतु खांदेरीवर किल्ला बांधू देता कामा नये असे सर्वांनाच वाटत असले तरी इंग्रजांना एकट्यालाच शिवाजी महाराजांशी लढू द्यावे व आपण बाजूूला रहावे, असे धोरण पोर्तुगिज व सिद्धीने स्विकारले. पुढे कॅप्टन केग्विनच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी वारंवार खांदेरीची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगिजांनी देखील इंग्रजांना वेळोवेळी सहाय्य केले. सिद्धीने तर उंदेरी बेटाचा ताबा मिळवून तिथे किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला.
नाकेबंदी, दमदाटी, छुपे हल्ले यांद्वारे मराठ्यांना हरतऱ्हेने नामोहरम करण्याचे प्रयत्न झाले. परंतु दौलतखान, मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखालील आरमार या तिन्ही समुद्रीसत्तांना पुरून उरले.
      वैतागलेला कॅप्टन केग्विन म्हणतो,
   “आम्हाला वाटते ते (सिद्धीचे लोक) त्यांची बंदुकीची दारु निष्कारणच खर्च करतात; आवाजानेच त्यांचे (खांदेरीवरील लोकांचे) काही नुकसान होत असले तर गोष्ट वेगळी!”
     तर कॅप्टन अॅडर्टनने मुंबईला कौन्सिलला कळविले,
   “सिद्धी व (खांदेरी) बेट यांनी परस्परांवर अनेक तोफगोळे उडविले, पण उपयोग काही झाला नाही. आमच्या शत्रूची खांदेरी येथील भिंत बरीच उंच झाली आहे आणि हे तिच्यावर अतिशय झटून काम करित आहेत.”
  पुढे १ जानेवारी १६८०च्या पत्रात मुंबई कौन्सिल म्हणते,
  “आम्हाला वाटते खांदेरी बेट शिवाजीच्याच ताब्यात राहणार कारण ते आश्चर्यकारकपणे टिकाव धरून आहे.”
   
या संघर्षात दोन्ही बाजूंची प्रचंड शक्ती खर्च झाली. ब्रिटीश सत्तेलाही हा खर्च परवडेनासा झाला. या कारणांमुळे अखेर ब्रिटीशांनी व मराठ्यांनी तह करायचा निर्णय घेतला. नाविक युद्धात पारंगत असलेल्या इंग्रज व सिद्दी यांच्यासारख्या शत्रूंना तोंड देऊन मराठ्यांनी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे काम तडीस नेले.               
भारताच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही  सत्तेने इंग्रजांसोबत नाविक युद्ध केले नव्हते आणि यापुढेही ही इतर कोणत्याही सत्तेने केले नाही. 
    शिवाजी महाराजांच्या सागरी पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील या महत्त्वपूर्ण ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या.

                                          - तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...