Search This Blog

Wednesday, June 24, 2020

पैंजण खुणा


         बायने चिनूला हलकेच उठवले. बाहेर पडताना आतून कडी लावण्याच्या सूचना तिला दिल्या. जाताना शेजारच्या नंदाला तिने आवाज दिला. नंदादेखील आज सोबतीला येणार होती. नंदाच्या घरचा दरवाजा उघडला गेला. दारातच उभे राहून तिने येणार नसल्याचे खुणवले. पहाटेची वेळ असली तरी अंधार होता. बाहेर एकटीने जायची हिंमत नव्हती. पण फार थांबून चालणार नव्हते. उजाडायच्या आत बायला घरी परत यायचे होते. आज चिनूसाठी जाणे गरजेचे होते. 
          चिनू ही बायची मुलगी. ती यंदा आठवीच्या वर्गात गेली होती. चिनू चौथीला असतानाच वडीलांचे निधन झाले होते. खारपट्टयातल्या आपल्या लहान शेतात बायला आपला पती निष्प्राण अवस्थेत आढळला होता. कधी काळी जोमाने पिकणारा जमिनीचा तो लहानसा तुकडा हाच दोघींच्या विश्वाचा सध्याचा आधार होता. समुद्रातून येणारे खारे पाणी अडवणारी बांधबंदिस्ती उध्वस्त झाल्यानंतर हा उरलासुरला आधारही खाऱ्या पाण्यात नासून गेला. त्यामुळे दोघींचे पोट भरण्यासाठी बाय अधूनमधून मिळणाऱ्या मजुरीच्या कामांबरोबरच, खाडीकिनारी मासेमारी करायची. कधी ‘आसू’ म्हणून ओळखले जाणारे लहान जाळे, कधी  ‘हिला’ तर कधी खेकडे पकडण्यासाठीचे ‘पेन्सान’ ;  गरजेनुसार बायची आयुधे बदलत असायची. यातून मिळणारी थोडीफार मासळी चिनू गावाच्या नाक्यावर जाऊन विकायची. ही ताजी पण लहान मासळी वाट्यावर विकली जायची. या सर्व उपद्व्यापातून त्या दिवसाचे कसेबसे भागायचे.  पण चिनूच्या शिक्षणाचा खर्च, औषधपाणी आणि इतर खर्च भागवताना बायला ब्रम्हांड आठवायचे.  गणेशोत्सव तोंडावर आलेला, शेतीची कामेही विसावलेली. मागच्या महिन्यापासून चिनूने नव्या पैंजणांसाठी हट्ट धरलेला. खरेतर आधीच्याच वर्षी बायने चिनूसाठी उर्साच्या बाजारातून नवे पैंजण घेतले होते. पण आता त्या खोट्या पैंजणांचा रंग बायच्या चेहऱ्यासारखाच निस्तेज झाला होता. चिनूच्या मैत्रिणी चांदीचे पैंजण घालायच्या. कपडे धुवायला विहिरीवर गेल्यावर थोडेसेच घासल्यानंतर चमकणारे मैत्रिणींचे पैंजण पाहून चिनूचे डोळेही चमकायचे.
यंदा काहीही करून चांदीचे छुमछुम वाजणारे पैंजण घ्यायचा निश्चय तिने केला होता. त्यासाठी मासे विकल्यानंतर येणाऱ्या पैशातून बचत करून चिनूने काही पैसे साठवले होते. पण कधी किराणा सामान संपले म्हणून तर कधी वीजबील भरण्यासाठी, तिने साठवलेला गल्ला वापरला गेला. आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून कधी फारसा हट्ट न करणाऱ्या चिनूची ही चंदेरी इच्छा पूर्ण करण्याचे बायने ठरवले. नेहमी मिळणाऱ्या मासळीपेक्षा थोडी मोठी मासळी मिळाली तर हजार-दोन हजार रुपयांची एकरकमी व्यवस्था होण्याची थोडीफार शक्यता होती. गौरींच्या सणापूर्वी चिनूच्या पायात पैंजणांचा आवाज यायला हवा, बायने मनोमन ठरवले होते.
        विचारांच्या गर्तेत बायने झपझप चालायला सुरूवात केली. आज तिने आपली नेहमीची आयुधे घेतली नव्हती. फक्त मच्छी साठविण्यासाठीचा बांबूच्या काड्यांनी विणलेला एक मोठ्ठा डोबुकरा आणि तो कमरेला बांधण्यासाठीचे एक फडके या दोनच गोष्टी सोबत होत्या. अंधार असला तरी रस्ता नेहमीचाच होता. तिच्या घट्टे पडलेल्या अनवाणी पायांना खडे जाणवतही नव्हते. भिती वाटत नव्हती पण नंदा सोबत असायला हवी होती असे बायला वाटले. खारीतल्या ओसाड शेताच्या बांधांवरून गेलेल्या रस्त्यावरून बराच वेळ चालल्यानंतर ती मीठागरापाशी पोहोचली. सूर्य उगवायला काही अवधी बाकी होता, पण दिशा उजळल्या होत्या.
या मंद प्रकाशात बांधरस्त्यावरच्या मीठाच्या झाकलेल्या राशी टेकडीसारख्या भासत होत्या. बाजूला एक लहान कौलारू चौकी होती. बरेचसे मीठकामगार म्हणजेच खारवे इथेच रहायचे. परंतु मीठ बनवण्याचे काम संपले असल्याने आता या चौकीत एखादाच राखणदार असण्याची शक्यता होती. बाय मीठागरात जाण्यासाठी बनवलेल्या लाकडी साकवावरून आत उतरली. उन्हाळ्यात चमचमणाऱ्या मीठाच्या थरांनी भरलेल्या चौकोनी कोंड्या सध्या पाण्याने भरल्या होत्या. पावसामुळे कोंड्यांचे बांध ढळले असले तरी मूळ रचना हरवली नव्हती. पण पावसाच्या पाण्यामुळे त्यांना एखाद्या उथळ हौदाचे रुप आले होते. काही कोंड्यांमध्ये शेैवाल, पाणवनस्पती साठल्या होत्या. कोंड्यांमध्ये फूट-दोनफूट पाणी असावे. झाकून ठेवलेले मीठ राखण्यासाठी चौकीत एकतरी खारवा रहात असल्याने गेल्या तीन-चार महिन्यांपासून या पाणी साठलेल्या मीठागरात कोणी प्रवेश केला असल्याची शक्यता नव्हती. पावसाळ्यात बरेचसे समुद्री जीव या पाण्यात विसावलेले असतात. त्यामुळे इकडे तिकडे नशिब आजमावण्यापेक्षा इथेच मासे मिळण्याची खात्री जास्त. बायने हाच विचार करून कोंड्यांमध्ये हळूवार पाऊल ठेवले. पाण्यात फार आवाज  करून चालणार नव्हते. राखण करणारा खारवा उठण्यापूर्वी कमरेला बांधलेला मोठ्ठा डोबुकरा चांगल्या मच्छीने भरणे गरजेचे होते.
या फुटभर खोल पाण्यात कोणतेही जाळे न वापरता हाताने चाचपून मासे धरण्याचे एक तंत्र वापरले जाते. बायकडे ते कौशल्य होतेच. बायने आयताकार कोंडीच्या एका टोकापासून चाचपायला सुरूवात केली. तिच्या हालचालींनी नितळ पाणी ढवळले गेले. लहान लहान मासे पाण्यात धावायला लागले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून थोड्या मोठ्या आशेने बाय गुडघ्यांवरच पुढे  सरकू लागली. पाण्याखालील चिखलात एक मासा मिळाला, चांदीच्याच रंगाचा. बायला चिनूच्या पायातल्या संभाव्य पैंजणांचा रंग आठवला. बाय पुढे जात होती, मासे मिळत होते. तिची एक नजर चौकीकडे होती. कोंडीतल्या सर्व शक्यता चाचपून झाल्यानंतर बाय कोंडीच्या दुसऱ्या चौकटीत उतरली. इथेही हाताला चांगलेच मासे मिळत होते. कोंडीच्या एका कोपऱ्यावर चाचपताना बायच्या हाताला थोडे टणक कवचासारखे काहीतरी लागले. तिने ओळखले. पण न पाहता त्याला हात लावायची हिंमत होईना. त्याची जागा लक्षात ठेवून बायने कोपऱ्यातल्या हार या जल वनस्पतीकडे पाहिले.
आपला स्पर्श झालेला जीव खेकडा असल्याची बायला खात्री होती. त्यामुळे खेकड्याच्या नांग्यांपासून वाचण्यासाठी ही जाळीदार वनस्पती वापरल्यास थोडेफार संरक्षण होते, हे ओळखून बायने पाण्यातले हार आपल्या जवळ ओढले. लक्षात ठेवलेल्या जागेवर जाऊन वनस्पतीची जाळी गुंडाळलेल्या हाताने चाचपले. तिथे काहीही नव्हते. बहुतेक खेकड्याने जागा सोडली होती. बायने आजूबाजूला हात फिरवला. निराशेने ती उभी राहीली. पुढे पाऊल टाकल्याबरोबर तिच्या पायाच्या घोट्याला जोरकस चावा बसला. कळ मेंदूपर्यंत गेली. तिच्या तोंडून जोरदार किंचाळी बाहेर पडली. ओरडत असतानाच तिने एका हाताने घोट्याजवळच्या खेकड्याला हात घातला. तिच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठ्या आकाराचा तो खेकडा होता. घोट्याभोवतीची नांगीची पकड सोडवावी की खेकडा पकडावा या विचारात असतानाच चौकीत हालचाल झाली. काठी आपटत एक खारवा तिच्या दिशेने पळत येताना दिसला. बायने धाडसाने वाकून खेकड्याच्या दोन्ही नांग्या दाबून धरल्या. खेकड्याने स्वत:च्या बचावासाठी चावरी नांगी शरीरापासून मुक्त केली. त्याबरोबर बायने त्या एकच नांगी शिल्लक असलेल्या खेकड्याला उचलून दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवले. दोन हातांमध्येही तो खेकडा नीटसा मावत नव्हता. तोपर्यंत चौकीतला राखणदार ओरडत आला होता. दोघांमध्ये फक्त पंचवीसएक पावलांचे अंतर होते. बायच्या पायाच्या घोट्याला त्या खेकड्याची नांगी घट्ट रुतली होती. पण आता वेळ नव्हता. तीने एकदा कमरेचा फडका घट्ट केला आणि एका हातात खेकड्याला पकडून पळत सुटली. पाण्यातून सहज पळता येत नव्हते. प्रत्येक पावलागणिक घोट्यातून कळ येत होती. बायने तीन चार कोंड्या सहज पार केल्या. या दिशेला मीठासाठी पाणी घेण्यासाठीचा एक अरूंद नाला होता. तो पार करण्यासाठी साकव नव्हता. बायने त्यात उडी टाकून दोन पावलांत तो पार केला. मागे वळून पाहिले, खारवा कंटाळून थांबला होता. बाय तशीच बांधावरच्या मुख्य रस्त्याला लागली. आता कोणी मागावर येण्याची शक्यता नव्हती.आता लख्ख उजाडले होते. या उजेडात बायने घोट्याला घट्ट बसलेली नांगी पाहिली. ही मोठ्ठी नांगीसुद्धा खेकड्यासोबत विकता येईल, बायने विचार केला. तिने कमरेला बांधलेले फडके सोडले. डोबुकऱ्यातील मासळी समाधानाने पाहिली. त्यात हातातला मोठ्ठा खेकडा मावणार नव्हता. त्यामुळे त्याला तसेच फडक्यात गुंडाळून ठेवले. घोट्यावरची एक नांगी तशीच होती. नांगीचे दात तिच्या हडकुळ्या शरीरात रुतले होते. बायने दोन्ही हातांनी जोर करून घोट्यावरच्या निर्जीव नांगीची जीवघेणी पकड सोडवण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. बऱ्याचदा ही पकड सोडविण्यासाठी नांगीच चावायची असते. पण पायाकडील ही नांगी बायला चावताही येईना. खाली बसून तिने एका दगडावर आपला दुखरा उजवा पाय ठेवला. दुसऱ्या लहान दगडाने ती नांगी ठेचली. दगडाचे दोन फटके बसताच पकड सैल झाली. नांगी आणि पाय दोन्ही मोकळे झाले. दात रुतलेल्या जागेतून रक्त येत होते. वेदना होत होत्या. ठेचलेली मोठी नांगी विकता येणार नाही म्हणून बाय नाराज झाली. उठून तिने खाऱ्या पाण्यात तो रक्ताळलेला पाय धुवून काढला. जखमेला खारे पाणी झोंबत होते. पण आता पळायचे नसल्याने तीला बरे वाटू लागले. हातातल्या वजनदार आणि गच्च भरलेल्या डोबुकऱ्याने तिला हलके हलके वाटत होते.  
          घरी येईपर्यंत चिनूने चूल पेटवून पाणी गरम करून ठेवले होते. बायने मासळी एका भांड्यात ठेवली. त्याचे वाटे बनवून चिनूला त्यांची किंमत समजावली. फडक्यातला मोठा खेेकडा तिनशेच्या खाली कोणाला देऊ नको म्हणून सांगीतले. इतकी चांगली मासळी पहिल्यांदाच मिळाली होती. चिनूच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. हे वाटे घेऊन चिनू गावातल्या नाक्यावर मच्छी विकायला निघून गेली. अंगावर कडक तापलेले पाणी घेऊन बायने आपला थकवा घालवला. जखमेच्या जागी हळद लावली. भाकरीचे पीठ घेऊन नेहमीच्या तयारीला लागली. सोबत खेकड्याच्या ठेचलेल्या नांगीचे कालवण बनवायला घेतले. काही तासांनी चिनू परत आली. चिनूने आज एकाही वाट्याची किंमत कमी केली नव्हती, तरीदेखील सगळी मासळी विकली गेली होती. खोचलेल्या पिशवीतून तिने आजच्या विक्रीचे सर्व पैसे जमिनीवर ओतले. नोटा, नाणी मोजायला सुरूवात केली. दहाची एक फाटकी नोट त्यात होती. ती नंतर चिकटवून वापरता येईल म्हणून वेगळी ठेवली. “दोन हजार दोनशे तीस!” चिनू आनंदाने म्हणाली. आज चांगलीच कमाई झाली होती. बायने त्यातले दोनशे वीस रुपये व दहाची फाटकी नोट बाजूला काढली. दोन हजार रुपये तिच्या बटव्यात ठेवले. दुसऱ्या दिवशी बाय चिनूला घेऊन तालुक्याच्या बाजारात गेली. हजार रुपयांपर्यंतचे पैंजण तिला घ्यायचे होते. दागीन्यांची एक दोन दुकाने पालथी घातल्यानंतर एका ठिकाणी तिच्या आवडीची साखळीची नक्षी असणारे पैंजण दिसले. हौसेने हातात घेऊन न्याहाळताना, त्यावर लटकलेली अठराशे रुपयांची चिठ्ठी चिनूला दिसली. तिने अलगदपणे ते पैंजण हातातून खाली ठेवले. बायला कागदावरचे वाचता येत नव्हते, पण तिने मुलीच्या डोळ्यांतले भाव मात्र अचूक वाचले. अठराशे रुपये रोख मोजून बायने तेच पैंजण घेतले. दोघी घरी आल्या.
       घरात पाऊल ठेवताच चिनूने गडद गुलाबी रंगाच्या कागदातील चांदीचे लख्ख चमकणारे पैंजण काढले. कानाजवळ नेऊन त्याच्या घुंगुरांचा आवाज ऐकला. बायला हाक मारून बसण्यास सांगीतले. पैंजण स्वत:च्या पायात घालण्यापूर्वी एकदा आईच्या पायात घालण्यासाठी तिने बायला एक पाय पुढे करण्यास सांगीतला. बायने गंमतीने हसून उजवा पाय पुढे केला. चिनूने बायच्या पायाचा घोटा पाहीला. खेकड्याच्या नांगीतील दातांनी झालेल्या जखमांपासून एक विलक्षण साखळीसारखी नक्षी बायच्या घोट्यावर तयार झाली होती... 
अगदी चिनूच्या हातातील पैंजणांसारखी...!

- तुषार म्हात्रे (tusharki)

Friday, June 12, 2020

शरभाचे सांगणे



शरभाचे सांगणे : शोध आवरे किल्ल्याचा

         उन्हाळ्याचे दिवस संपत आलेले, सूर्य मावळतीकडे झुकलेला. “जावं की न जावं?” अशी द्वीधा मनस्थिती झालेली. समोर डोंगर व्यापून पसरलेला विशाल वटवृक्ष, त्याच्या एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या हात पसरून आम्हाला येण्याचं आमंत्रण देत होते. तर दुसरीकडे आकाशकंदीलांप्रमाणे लटकणारी मधमाशांची पोळी भिती निर्माण करत होती. आम्ही उभे असलेल्या जागीसुद्धा अधून मधून मधमाशा घोंगावत जात होत्या. 
विशाल वटवृक्ष

मधमाशा सगळ्यांना चावत नाहीत, ज्याला चावतात त्यालाच चावतात!
   काही दिवसांपूर्वीच ऐकलेले एका सहकारी मित्राचे  शब्द आठवले. मला यापूर्वी चार वेळा या मधमाशांचा(की वधमाशांचा?) प्रसाद मिळालेला. त्यामुळे ‘ज्याला चावतात त्यालाच चावतात’ हे वाक्य डेली सोपच्या कानठळ्या बसवणाऱ्या संवादांसारखे कानात घुमत होते.
वटवृक्षाचे अंदाजित केंद्र
पण सोबतीला असलेल्या काकाने होकार दिला, आणि दोघेही वडाच्या आतील भागाकडे निघालो. वाटेत मधाचे पोळे पडले होते, बहुधा मध गोळा करणाऱ्यांकडून ते टाकले गेले असावेत. मूळ-पारंब्या-खोड यातील फरक कळणार नाही इतपत हा वृक्ष एकरूप झालेला, त्यातच संध्याकाळ झालेली. एक दोन मधमाशा डोक्याजवळून गेल्या. धीर करून या सुमारे हजार चौरस मीटर परिसरात पसरलेल्या वृक्षाच्या केंद्रापर्यंत पोहोचलो. चप्पल बाजूला काढून दगडांच्या आडोशाला बसलेल्या शेंदूरविलेपित ‘वाघेश्वराला’ नमस्कार केला. वटवृक्षाचे गूढ सौंदर्य एकवार न्याहाळले आणि दूर अंतरावर आमच्या दोघांची वाट बघत असलेल्या कुटूंबकबिल्याच्या दिशेने निघालो.
वाघेश्वर (शरभ शिल्प)

       उरण तालुक्यातील आवरे गावाच्या दक्षिणेला असणारे सुप्रसिद्ध ‘बामून देव’ मंदिर आणि त्याच्या समोरील टेकडीवरचा हा वटवृक्ष. या टेकडीला इथले स्थानिक ‘किल्ला’ म्हणतात.(काही नागरिकांच्या मते त्याचे नाव मर्दनगड आहे.) जिल्हा गॅझेटिअर्स किंवा तत्सम प्रकारच्या कोणत्याही दप्तरी नोंद नसलेला हा किल्ला.
बांधणीचे दगड
केवळ बांधणीच्या दगडांची रास आणि कच्च्या पायाचे अस्तित्व शिल्लक असलेल्या या टेकडीला किल्ला तरी म्हणावे का असा प्रश्न पडतो.
दगडांची रास
पण या कच्च्या पायाजवळ उभे राहील्यास मुंबई- करंजा-अलिबाग हा संपूर्ण समुद्री मार्ग एका नजरेत दिसतो. त्यादृष्टीने पाहील्यास हे ठिकाण टेहेळणीच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट ठरते. या टेकडीवरील किल्ला अथवा टेहळणी बुरूजाच्या अस्तित्वाला या टेकडीवरच्या ‘वाघेश्वराने’ दुजोरा दिला. वटवृक्षाच्या अंधाऱ्या छायेत विसावलेला हा ‘वाघेश्वरच’ आवरे किल्ल्याच्या इतिहासाला प्रकाशात आणण्याचे काम करू शकेल.

कच्चा पाया
वाघाचे शिल्प म्हणून वाघेश्वर, अशा अर्थाने हे ग्रामदैवत पुजले जाते. कोरीव वाघ अथवा सिंहसदृश प्राणी असणारे हे शिल्प सामान्यत: ‘शरभ’ म्हणून ओळखले जाते.

आता शरभ म्हणजे काय, ते जाणून घेऊ!

     शरभ हे एक द्वारशिल्प आहे. गड, मंदिरे, सभामंडप यांच्या प्रवेशद्वारांवर शिलालेखांच्या बरोबरीने द्वारशिल्प लावलेली असतात.महाराष्ट्रातील किल्ल्यावर सर्वात मोठय़ा प्रमाणावर आढळणारं द्वारशिल्प म्हणजे शरभ.
शरभ शिल्प
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा, सुधागड, जंजिरा, रायगड या किल्ल्यांवर शरभ शिल्प आढळते. अगदी श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजावरील चिन्हही शरभच आहे. सिंह आणि व्याल यांच्यासारखे विक्राळ तोंड, चार पाय आणि लांब शेपटी असणारा काल्पनिक प्राणी म्हणजे शरभ. 
गड, कोट व दुर्गांच्या बांधणीविषयक ग्रंथांमध्ये शरभ शिल्पांची फारशी माहिती दिलेली नाही. परंतु ‘कामिकागम’,‘ उत्तरकामिकागम’, ‘श्रीतत्वनिधी’ आणि ‘शरभोपनिषद’ या ग्रंथांत शरभाचे वर्णन आणि त्याची उपासना केल्याने होणारे फायदे दिलेले आहेत.शरभ हा शंकराचा अवतार मानला जातो. भगवान शंकराने धारण केलेले काल्पनिक रूप म्हणजे शरभ. शरभ संकल्पनेबद्दल अनेक कथा ऐकवल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, हिरण्यकश्यपू वधासंदर्भातली.
नरसिंह अवतार
       “हिरण्यकश्यपू हा शंकराचा भक्त. भगवान विष्णूने नरसिंहाचे रूप धारण करून हिरण्यकश्यपूला मारले. पण या वधानंतर नरसिंह उग्र झाला. त्याने लोकांना त्रास द्यायला सुरूवात केली. त्रस्त आणि भयभित लोक भगवान शंकराला शरण गेले. नरसिंहाला नियंत्रित करून त्याला शिक्षा करण्यासाठी शंकराने पशू, पक्षी व नर यांची एकत्रित शक्ती घेतली आणि ते लोकांसमोर प्रकटले. दोन तोंडे, आठ पाय, दोन पंख व लांब शेपूट अशा शरभ रुपातील शंकराने नरसिंहाला फाडले आणि त्याचे कातडे अंगावर पांघरले व त्याचे डोके स्वत:च्या मस्तकावर धारण केले.”
शरभ अवतार

         ‘मूर्तिविज्ञान’ या ग्रंथाचे ग्रंथकार डॉ. ग.ह. खरे यांच्या मते ही कथा विष्णूपेक्षा शिव श्रेष्ठ असे दाखवण्याकरिता रचली गेली असावी. तसेच वरील वरील वर्णनाच्या मूर्त्या महाराष्ट्रात आढळत नसल्या तरी 
शरभ शिल्प
 येथील किल्ल्यांच्या द्वारांवर ‘चार पायांचा, तीक्ष्ण नख्या असलेला विक्राळ तोंडाचा, दोन पंखांचा किंवा पंख नसलेला आणि लांब शेपटीचा प्राणी काढलेला असतो, तो शरभ असावा असेही डॉ.ग.ह.खरे म्हणतात.
वरील सर्व बाबींचा विचार केल्यास, आवरे येथील टेकडीवरचे हे शिल्प शरभाचे आहे हे नक्की. शरभांच्या विविध शिल्पप्रकारांपैकी हा शिल्पप्रकार ‘केवल पंखविहीन शरभ’ आहे.
      आवरे येथील हा परिसर अरबी समुद्राला लागून असून, सध्या भरतीपातळीपासून सुमारे पन्नास ते शंभर मीटर अंतरावर आहे.
समुद्राच्या लाटांनी झिजलेला खडक
या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कातळाला समुद्राच्या लाटांनी खड्डे केल्याचे दिसून येते; याचा अर्थ पूर्वीच्या काळी ही टेकडी समुद्राला खेटून होती व कालांतराने समुद्र मागे हटला असावा.(पालघर जिल्ह्यातील केळवे किल्ल्याच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे.) या  जागेत असलेले बांधणीचे दगड, वाघेश्वर म्हणजेच शरभाचे शिल्प आणि या टेकडीचे भौगोलिक स्थान पाहता ‘आवरे’ गावात संरक्षण व व्यापारीदृष्ट्या महत्त्वपूर्ण असा किल्ला अथवा किल्लासदृश वास्तू होती हे नक्की.
गावातील काही तरूणांनी पुढाकार घेऊन काटे करवंदींच्या झुडूपाआड लपलेल्या या वास्तूची स्वच्छता करून इतिहास संवर्धनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. आपणही त्यापासून प्रेरणा घेऊया. यापूर्वी ठाणे येथे उत्खननात  सापडलेल्या महाकुमार केशीदेव या शिलाहार राजपुत्राच्या ताम्रपटात आवरे (अऊर) व पिरकोन (पिरकुन) या गावांचा उल्लेख होता.  या परिसराचा अधिक अभ्यास झाल्यास उरण तालुक्याच्या इतिहासात नव्याने भर पडू शकेल
      या परिसराच्या इतिहासाला ‘मधाचा गोडवा’ आहे, पण हा गोडवा मिळवण्याचा मार्ग काट्याकुट्यांनी भरलाय. हा आनंद मिळवण्यासाठी ‘कुतूहलाचा कीडा’ चावावा लागतो. शेेवटी हा कीडासुद्धा त्या मधमाशांप्रमाणेच आहे....
 ज्याला चावतो त्यालाच चावतो!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

संदर्भ: गड-मंदिरांवरील द्वारशिल्पं- महेश तेंडुलकर, मूर्तीविज्ञान- डॉ.ग.ह.खरे, साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची-प्रा.प्र.के.घाणेकर,
आभार: या शोधमोहीमेत सोबत असणारे प्रविण म्हात्रे, पूरक माहीती देणारे कौशिक ठाकूर, निवास गावंड यांचे आभार.

#शरभ #आवरे #तुषारकी #Sharabh #Aware #tusharki

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...