Search This Blog

Friday, August 23, 2019

चुलीवरचे जेवण!

  चुलीवरचे  जेवण!
(मुंबई सकाळ, रायगड टुडे 23 ऑगस्ट 2019)

महामार्गावरून सुस्साट गाडी निघालीय. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली. प्रवाशांच्या पोटात कावळे ओरडण्याची स्थिती. पोटातली भूक डोळ्यांवर स्वार होऊन हे प्रवासी रस्त्याच्या कडेचे फलक अधाशीपणे वाचू लागलेत.  हॉटेल, ढाबा, खाणावळी या अपेक्षीत नावांच्या रांगेत आणखी एक फलक लक्ष वेधून घेतो. ते विशिष्ट नाव वाचून आपसूकच गाडीचा वेग कमी होऊन, चाके त्या शब्दांच्या दिशेने वळली जातात.  पोटातली भूकेची अाग अधिकच उसळवणारे ते शब्द असतात, “चुलीवरचे अस्सल गावरान जेवण”. सध्याच्या काळात चलती असणारा म्हणजेच ‘ट्रेंड’मध्ये असणारा हा प्रकार.

        तसे पाहता ‘चुलीवरचे जेवण’ हा प्रकार आपल्याला नविन नाही. रायगड जिल्ह्यातील कोणतेही गाव घ्या, गावात चूल नाही असे गाव शोधूनही सापडत नव्हते. ‘घरोघरी मातीच्या चुली” ही म्हण सत्यात उतरवणारा हा परिसर. इथे अग्नीदेवाच्या आग्नेय स्थानाला इतर काही असेल नसेल, पण चूल होतीच. काही घरांमध्ये तर दोन-दोन चुली असायच्या. दोन्ही चुलींचे कार्य आणि ध्येय वेगवेगळे. यातील एक चूल शक्यतो आंघोळीसाठी लागणाऱ्या गरम पाण्यासाठीची. परिणामी या चुलीवरचा विस्तव मोठा आणि धगधगणारा. तर दुसर्‍या चुलीवर स्वयंपाकाची जबाबदारी. त्यामुळे इथे त्यामानाने कमी धगधगणारा,  पण सतत चालणारा विस्तव. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण सगळे उपद्व्याप एकाअर्थी चुलीतच. घरातल्या अविरत काम करणाऱ्या कर्तबगार मंडळींना लागणारा चहा आणि इतर गरम हवे असणारे पदार्थ, सारे याच जागेत. माणसाच्या पोटाची सोय करणाऱ्या चुलीच्या पोटासाठी मुख्यत्वे लाकडे, शेणाच्या गोवऱ्या आणि सालपटांची म्हणजेच सालप्याची सोय करावी लागते. कधीकधी चुलीच्या भुकेसाठी विविध प्रकारचे कागद, कचराही यांनीही काम भागते. या चुलीच्या मागे आणखी एक पोकळ जागा असते. त्याला रायगडच्या दक्षिण भागात वायन असे म्हणतात. चुलीत पेटत असलेल्या लाकडातून पुढे जाणारा विस्तव या वायनातून वर येतो. हे वायन म्हणजे चुलीवरच विस्तव वर येण्यासाठी तयार केलेली एक योजना असते. त्यामुळे या वायनावर एखादे जादा भांडे ठेवता येते. पाण्याची पातेली, दुधाची पातेली असलं किंवा गरम राहण्यासाठी काहीही यावर ठेवता येते. त्यामुळे एकाचवेळी दोन पदार्थ तयार होत असतात. तसेच चुलीवर आणखीही थोडी जागा आहे. त्याला पाटा किंवा भानस असे म्हणतात. त्याठिकाणी आगपेटी, कधी कधी फटाके, विड्या बनवण्यासाठी आपट्याची पाने आणि अशाच काही वस्तू ठेवल्या जात. या वस्तू तिथे शेकण्यासाठी ठेवलेल्या असतात. या उपयोगासह पूर्वी चुलीच्या वरच्या दिशेला आढ्याला एक बांबूची वस्तू बांधलेली असायची त्याला उत्तव म्हणत.  चुलीतल्या उष्ण प्रवाहांचा वापर करून मासळी, पापड सुकवणे यांसाठी त्याचा वापर होत असे.

           कालांतराने शहरीकरणाच्या लाटेत या मातीच्या चुलींतला विस्तव खऱ्या अर्थाने मंदावला. चुलींचा वापर ग्रामीण भागापुरता मर्यादित राहीला. पण जे चुलीवरचं अन्न खाऊन वाढलेत, त्यांना अधूनमधून या अन्नाची आठवण येतच राहते. त्यामुळे या जुन्या चवीच्या शोधात हे सर्व खवय्ये ढाब्यांवर, हॉटेलांत चुलीवरच्या जेवणाची मागणी करू लागले. खरंतर ‘चव’ ही एक सापेक्ष गोष्ट.  पदार्थाचे चविष्ट असणे वा नसणे, हे खाणाऱ्याच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते. तरीही सामान्यपणे जास्तीत जास्त लोकांना आवडणारा पदार्थ बनवण्याकडे आचाऱ्यांचा कल असतो. पण अन्नपदार्थ जर तेच असतील तर चुलीवर बनवले काय आणि गॅस, ओव्हनमध्ये शिजवले काय? काही फरक पडतो का? चुलीवरच्या जेवणाचे आकर्षण त्याच्या दुर्मिळपणामध्ये आहे की विशिष्ट चवीमध्ये आहे?
     थोडं शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहू. एखादा पदार्थ जिभेवर ठेवला की त्याची चव आपल्याला प्रामुख्याने जीभेवरील चवीच्या बिंदूंमुळे म्हणजेच ‘टेस्ट बडस्’मुळे कळते. असे हजारो चवीचे बिंदू माणसाच्या जिभेवर असतात. चवीच्या संदेशाचे वहन टेस्ट बडस् मधून चेतातंतूमार्गे मेंदूपर्यंत होते तेव्हा कुठे चव समजते. या सगळ्या चविष्ट प्रकरणात मेंदू शब्दश: ‘नाक’ खुपसतो. पदार्थाचा नाकाला जाणवणारा वास आणि जीभेने घेतलेली चव दोघांचे एकत्रीकरण होऊन एक विशिष्ट चव म्हणजेच ‘फ्लेवर’ बनतो. यातूनच त्या पदार्थाचा चविष्टपणा ठरतो. चुलीवरचे अन्न शिजवण्यासाठी इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जातो. लाकडामध्ये सेल्यूलोज, हेमिसेल्युलोज आणि लिग्नीन असे तीन मुख्य घटक असतात. यापैकी सुरूवातीचे दोन घटक वनस्पती पेशीच्या भिंतीची रचना करण्याचे काम करतात, तर तिसरा त्या भिंतींना बळकट करतो. ही द्रव्ये फिनॉलवर्गीय संयुगांनी बनली आहेत. लाकूड जळताना उष्णतेमुळे यातली संयुगे एकामागोमाग एक बाहेर पडू लागतात. सेल्युलोजमुळे फुरॉन्स, लॅक्टोन, अॅसिटल्डीहाईड यांसारखी रंगद्रव्ये, गंधद्रव्ये उधळली जातात. या गंधद्रव्यांमध्ये पुष्पगंधी, गोडसर तर कधी लोण्यासारखी वास असलेली संयुगे असतात. इतकेच नव्हे तर नारळ, पीच, सफरचंद अशी फळांसारखी विविधताही यात आहे. लाकडातील लिग्नीनमुळे व्हॅनिला, लवंगी आणि मसालेदार गंधछटा बाहेर पडतात. या सर्व गंधछटा चुलीवरच्या अन्नामध्ये मिसळल्या जातात व यातून इतरत्र सहज न मिळणारी एक विशिष्ट चव अन्नाला येते. ही चव खाणाऱ्याच्या जीभेवर रेंगाळत राहते. यातूनच ही चव अनुभवलेली माणसे अन्नाच्या शोधात असताना चुलीवरच्या जेवणाला प्राधान्य देतात.

     परंतु चुलीवरची ही खाद्य संस्कृती रूचकर असली तरी अन्न शिजवण्याच्या प्रक्रीयेतून निर्माण होणारा धूर या खवय्यांना दूर ढकलतो. इंधन म्हणून लाकडाचा होणारा वापरही पर्यावरणाच्या दृष्टीने परवडणारा नाही. यामुळे ‘चुलीवरचे जेवण हवे असणाऱ्या खवय्यांसाठी भविष्यात एखाद्या कंपनीने ‘चुल फ्लेवर्ड मसाला’ आणल्यास नवल वाटणार नाही.

                                                        - तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Friday, August 9, 2019

सन हाय, नारली पुनवंचा...

सन हाय, नारली पुनवंचा...
(http://product.sakaalmedia.com/portal/SM.aspx?ID=158111 )

      उरण तालुक्यातील करंजा परिसरातील दृश्य. शाळेतले विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या मदतीने कसलीतरी कलाकृती बनवण्यात गर्क आहेत. दोन तीन लहान बांबू, वर्तुळाकार लोखंडी सळ्या, काही जाडे भरडे कापड, सोनेरी कागदं, सोललेल्या नारळांचा भाग यांसारख्या वस्तूंची जमवाजमव चाललेली. पुरेशी सामग्री जमल्याची खात्री पटल्यानंतर उत्साहाने प्रत्यक्ष कामाला सुरूवात होतेय. बांबूच्या पट्टयांना अंडाकृती आकार देऊन आता तो एका हातगाडीवर ठेवला जातोय. नंतर त्याला जाड कापडाने लपेटले जाईल. त्याभोवती चमकदार सोनेरी कागद चिकटवून एक भला मोठा सोन्याचा नारळ तयार होईल. ही सर्व उठाठेव चालू आहे ती येऊ घातलेल्या पौर्णिमेसाठी; ‘नारळी पौर्णिमे’साठी! समस्त कोळी बांधवांचा हा सर्वात महत्त्वाचा सण. या दिवशी येथील विद्यालयातून वाद्ये आणि लेझिमच्या तालावर पारंपारिक वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांच्या साथीने सोन्याच्या नारळाची मिरवणूक समुद्राच्या दिशेने निघेल. गेल्या कित्येक वर्षापासून करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या कलेच्या माध्यमातून  संस्कृतीशी नाते जोडणाऱ्या या अनोख्या उपक्रमात सहभागी होतात.

       रायगड जिल्ह्यातील उरण, अलिबाग परिसरातील कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय  मासेमारी. समुद्रातून जाळ्याच्या साहाय्याने मासे पकडणे आणि ती बाजारात विकण्यासाठी घेऊन जाणे हे मुख्य काम. उदरनिर्वाहासाठी ते वर्षाचे आठ महिने म्हणजेच नारळी पौर्णिमेपासून ते शिमगा-होळीपर्यंत खोल समुद्रात मासेमारी करतात. जून महीन्यापासून आपल्या भागात पावसाला सुरुवात होते. पावसाळ्यात समुद्राचे रौद्र रूप त्यांना मासेमारीसाठी धोकादायक असते. हाच काळ माशांचा प्रजनन काळ असतो. यामुळे या काळात मासेमारी बंद असते.या दरम्यान मासेमारी केल्यास समुद्रातील मत्स्यजीवांची संख्या घटत असल्याने दर वर्षी या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी घालण्यात येते. यामुळेच हे कोळी बांधव पावसाळ्यात खाडीतील लहान - सहान मासे पकडून आपली गुजराण करतात. यासह सुक्या मच्छीच्या विक्रीतूनही त्यांना उत्पन्न मिळते. या बंदीच्या काळात होड्यांची डागडुजी करणे, रंगरंगोटी करणे, जाळे विणने यांसारखी कामे हातात घेतली जातात.


        श्रावण पौर्णिमेपासून मच्छीमारीसाठी होड्या समुद्रात सोडल्या जातात. लहान व्यापारी जहाजेही याच काळात समुद्रात प्रवेश करतात. पावसामुळे रौद्ररूप धारण केलेल्या दर्याराजाला, ‘आता तू शांत हो. तुफान, वादळ यापासून आमचे रक्षण कर’ असे म्हणत नारळ अर्पण केला जातो. समुद्र नावाची स्वतंत्र देवता पुराणांत उल्लेखली असली तरी इथे सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. समुद्राचे जल हे वरुणाचे रुप मानून त्याची प्रार्थना या दिवशी केली जाते. इंद्र-अग्नि-वरूण हे  वैदिक देवता संघातील त्रिकूट. पौराणिक काळात इंद्र व अग्नीसह वरूणदेवाचे स्थान ढळून तो फक्त ‘यादसांपति’ म्हणजे जल जंतूंचा स्वामी  असे नाव धारण करून पश्चिम दिशेचा अधिपती म्हणून विख्यात झाला. पश्चिम समुद्राच्या पलिकडे त्याची ‘विश्वावती’ नावाची नगरी असल्याचे मानले जाते. मगर वाहन असलेला वरूण आपल्या हाती कमल, पाश व घट धारण करतो. परंतु कालांतराने वरूणाच्या प्रतिमांऐवजी केवळ पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन करण्यात येऊ लागले. याच पद्धतीने वरूणाला स्मरून समुद्राच्या जलाचे पूजन केले जाते.
या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यासाठी प्रत्येक कोळी कुटुंबातला एखादातरी  पुरुष जातोच. गावकरी नवीन वस्त्रालंकार घालून ढोल, ताशे, सनई यांसह वाजतगाजत समुद्राकाठी जातात आणि सागराची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात आणि प्रार्थना करतात. या दिवशी मुंबई,रायगड येथील कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेची लगबग पहायला मिळते. कोळी महिलांसह लहान मुले घराघरांत सजावट करतात. किनारी नांगरून ठेवलेल्या होड्यांना रंगरंगोटी करतात,  होड्या सजवतात. नैवेद्यासाठी ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक तयार करतात. कोळीवाड्यातील उत्साह यादिवशी समुद्राच्या लाटांसारखाच उसळतो. काही ठिकाणी भव्यदिव्य मिरवणुका काढण्यात येतात. मासेमारी करणारे लोक दर्याराजाला नारळ अर्पण करून मासळीचा दुष्काळ सरण्याचे आवाहन करतात. या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर कोळीनृत्यासह आनंदोत्सव साजरा केला जातो. अखेर सजवलेल्या बोटी समुद्रात ढकलून सागरप्रवासाला, मासेमारीला पुन्हा एकदा आरंभ केला जातो.
    काळाप्रमाणे या सणामध्येही जुन्या कोळीगीतांसह आधुनिक गीत-संगीताचाही शिरकाव झालाय. पारंपारिक वाद्यांची जागा डॉल्बी सिस्टीमने घेतलीय. उत्साह तसाच आहे, पद्धत बदललीय. कर्णमधुर आवाजाची जागा, कर्णकर्कश आवाजाने घेतलीय.  आवाजाच्या खवळलेल्या समुद्रात करंजा येथील विद्यार्थी अर्पण करत असलेला कलेचा श्रीफळ नक्कीच आशादायी आहे. हाच दृष्टीकोन इतरांनीही ठेवला तर खऱ्या अर्थाने आनंद लुटता येईल; सर्वांनाच!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(विशेष आभार : निलेश म्हात्रे, दिनेश जोशी, विजय पाटील)

Saturday, August 3, 2019

संस्कृती नागपूजनाची

संस्कृती नागपूजनाची!
(मुंबई सकाळ, रायगड टुडे 3 ऑगस्ट 2019)
           आवास; रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग शहरापासून अवघ्या पंधरा कि.मी. अंतरावरील नयनरम्य स्थळ. मुंबईकरांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या रेवस, मांडवा या ठिकाणांपासून अगदी लागूनच. या स्थळाचा उल्लेख अगदी स्कंद पुराणातही आहे. अभिजित नावाचा शिवपूजक राजा येथेच स्थायिक झाला होता. या परिसरात श्री वक्रतुंड गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. कार्तिक शुद्ध चतुर्दशीला श्री नागेश्वराच्या म्हणजेच नागोबाच्या जत्रेत या वक्रतुंडाचाही छबिना उत्सव साजरा होतो. प्राचीन काळी इथे नागोबा आणि त्यांचे शिष्य बुधोबा व चांगोबा यांनी समाधी घेतल्याचे सांगीतले जाते. या साधूंची स्मृती ‘नागोबा मंदिराने’ जपली आहे. मंदिरात एक जोडी आणि एक स्वतंत्र अशा नागांच्या तीन सुंदर प्रतिमा आहेत. या मंदिराबरोबरच जवळच्या कनकेश्वर मंदिराचाही नागाशी संबंध आहे. कनकेश्वराकडे जाताना उंच डोंगरावर एक विश्रांतीचा टप्पा आहे. दगडी ओटे असलेल्या या टप्प्याला ‘नागोबाचा टप्पा’ म्हणतात. नागपंचमीला बाजूच्या घळीतून नागोबा निघतो, अशी आख्यायिका आहे. खरंतर अशा कथा आपल्या परिसराला नविन नाहीत. अनेक ठिकाणी थोड्याफार फरकाने ‘नागोबा’च्या आख्यायिका सांगीतल्या जातात. सर्प प्रजातीला शेषाचे रुप समजून पुजण्याची प्रथा पूर्वापार चालू आहे. हे नागपूजन प्रतिकात्मक रुपात केले जाते. यातूनच नागशिल्पांची निर्मिती झाली.

          केवळ रायगडच नव्हे तर संपूर्ण भारतात नागपूजन होत असते. सध्याच्या काळात जसा नागपंचमी हा सण साजरा होतो, तसा प्राचीन काळात नागांचा उत्सव ‘नागमह’ नावांने साजरा होत असे. हजारो वर्षांत नागपूजेचे केवळ स्वरूप बदलत आले, पण मूळ गाभा तसाच आहे. यक्षपूजेप्रमाणेच नागपूजेचाही हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माशी समन्वय दिसून येतो. नागांना या धर्मांत उपदेवतांची स्थाने मिळाली. मथुरेजवळील सोंख येथे डॉ. हर्बट हर्टल यांनी जे उत्खनन केले त्यात तेथे कुषाणकाळांतील म्हणजे अंदाजे दुसऱ्या शतकातील एक सुंदर नागमंदिर असल्याचा पुरावा हाती आला. हे नागमंदिर विटांचे असून अर्ध-लंबवर्तुळाकार होते. याच परिसरातून अप्रतिम कलाकृती असलेली नागशिल्पेही मिळाली. यावरून मथुरा हे कुषाण काळात नागपूजेचे एक मोठे केंद्र असल्याचे सांगता येईल. या काळांतील सुरूवातीच्या मूर्तींमध्ये मानवी रुपातील नाग दाखवून त्याच्या पाठीमागे सर्पाची वेटोळी किंवा उभा साप दाखवला जात असे.  फर्ग्युसन आणि ओल्डहॅम या तज्ञांच्या मते हे नाग म्हणजे सर्पपूजक मानव असावेत. सर्प हे त्यांचे वंशचिन्ह.  पुढे हेच मानव  नाग किंवा सापाशी तादात्म्य पावले. नागाशी संबंध असलेल्या देवांना मानव रूपांसह नागरूपांत दाखविण्याची पद्धत इसवीसनाच्या आधीपासूनच होती. सांची, अमरावती याठिकाणच्या बऱ्याचशा मूर्त्यांमध्ये नाग किंवा सर्पफणा असलेल्या स्त्रीया आढळतात. या सापाचा फणा छत्रासारखा डोक्यावर उभारलेला असायचा. यातील डोक्यावरील सर्प फणांची संख्या त्या पुरूषांच्या किंवा स्त्रीयांच्या सामाजिक हुद्द्यावर अवलंबून होती. या रचनांमध्ये कालांतराने बदल होऊन मानव प्रतिमांच्या मागे सर्पफणा दाखवण्याऐवजी मानवाचे मुखच सर्पाफण्याचे दाखवण्याची पद्धत सुरू झाली. या नागांच्या शरीरावर खवले दाखवणे, मस्तकावर स्वस्तिक किॆवा इतर शुभचिन्हे दाखवणे इत्यादी प्रकारही होते. या नागांच्या सळसळत्या जिभाही काही प्रतिमांमध्ये अंकीत केल्या गेल्या आहेत. कुषाणकाळानंतर मात्र नागप्रतिमांमध्ये जुनी वैशिष्ट्ये नाहीशी झाली. पुढच्या काळात वेटोळे घातलेला नैसर्गिक साप सर्वत्र दिसू लागला. याचबरोबर एकाच दगडावर कोरलेले नाग-नागीण शिल्पही तयार होऊ लागले. अंबरनाथ येथील सुप्रसिद्ध शिवमंदिराच्या बाहेरच्या बाजूला नदीकाठावर असे शिल्प आहे. या प्रकाराला दक्षिणेत ‘नाग-कल’ म्हणतात. या प्रतिमांमध्ये सध्या आढळणारा सर्वसामान्य प्रकार म्हणजे उभा साप. आवासच्या नागोबा मंदिरातील प्रतिमा याच स्वरूपाच्या आहेत. रायगड किल्ल्यावरील बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या वास्तूवरही असाच एक उभा साप कोरला आहे. नागांचा पाण्याशी जवळचा संबंध असतो. त्यामुळे बऱ्याचशा नाग मूर्त्या पुष्करणींच्या किंवा तलावांच्या काठावर आढळतात.


        नाग हे पूजनीय असले तरी काही पौराणिक कथांमध्ये नागांशी संघर्ष सुद्धा झाल्याचे दिसते. श्रीकृष्णाने केलेले कालियामर्दन हे याच संघर्षाचे उदाहरण. भगवान विष्णूचे वाहन गरूड व नागांचे वैर, तक्षकाचा परीक्षिताशी संबंध, जन्मेजयाचा नागयज्ञ व त्यात नागांचा संहार अशी संघर्षांची अनेक  उदाहरणे आढळतात. केवळ हिंदू कथांमध्येच नव्हे तर बौद्ध व जैन कथांतही असे प्रसंग आहेत. असे असूनही शिव, गणेश यांसारख्या देवतांसह त्यांनी धारण केलेल्या नागांना देखील सन्मान मिळाला आहे

   सुदैवाने नागांचे पूजन अजूनतरी प्रतिमा रूपातच मर्यादित आहे. नागपूजनाच्या पद्धतीविषयक संत कबीर म्हणतात,
“नाग पंचमी आवे जदे, कोले नाग माँडती,
दूध दही से पूजती।
साँची को नाग सामें मिल जावे तो,
पूजा फेंकी ने भाग जाती रे।।”
थोडक्यात माणसे पूजेसाठी नागाची मूर्ती मांडतात खरे , पण खरा नाग आल्यावर मात्र पळत सुटतात. त्यामुळे केवळ प्रतिमाच नव्हे तर जीवसृष्टीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सापांचेही रक्षण व्हावे ही अपेक्षा.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

(संदर्भ: भारतीय मूर्तीशासत्र, आडवाटेवरचा महाराष्ट्र)

रायगडची लोहयुगीन संस्कृती

रायगडची लोहयुगीन संस्कृती मँडागोरा! ‘पेरिप्लस ऑफ इरिथ्रीयन सी’ या अत्यंत पुरातन आणि महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांमध्ये नोंदवले गेलेले एक बंद...