महाराष्ट्रातील शेतीचा प्रवास
महाराष्ट्राच्या इतिहासात किल्ले, लेणी, राजे आणि युद्धांची जितकी चर्चा होते, तितकीच चर्चा शेतीची व्हायला हवी. कारण महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर तो शेताच्या बांधावर उभे राहिल्यास अधिक चांगल्या रीतीने समजू शकतो. आज आपल्या ताटात येणाऱ्या प्रत्येक घासामागे हजारो वर्षांचा अनुभव, प्रयोग आणि संघर्ष दडलेला आहे. मानवाने आयुष्याची सुरुवात शेतकरी म्हणून केलेली नव्हती. तो जंगलात भटकणारा, शिकार करणारा आणि कंदमुळे, फळे गोळा करून जगणारा होता. त्या काळात निसर्ग उदार होता. लोकसंख्या कमी असल्यामुळे जंगलातून मिळणारे अन्न पुरेसे होते. पण हळूहळू लोकसंख्या वाढू लागली. उपलब्ध अन्न कमी पडू लागले. तेव्हा माणसाला एक मोठा प्रश्न पडला. अन्न शोधत फिरायचे की अन्न स्वतः निर्माण करायचे? या प्रश्नातूनच शेतीचा जन्म झाला असावा. जगात सुमारे दहा ते आठ हजार वर्षांपूर्वी नवाश्मयुगात शेतीची सुरुवात झाली, असे पुरातत्त्वीय पुरावे सांगतात. शेतीचा शोध हा एका दिवसात लागलेला नव्हता. सर्वप्रथम माणसाने प्राणी पाळायला सुरुवात केली. मेंढ्या, शेळ्या, गायी...