पुरंदरच्या तहाची साक्ष देणारा कर्नाळा
पुरंदरच्या तहाची साक्ष देणारा कर्नाळा ११ जून हा दिवस स्वराज्याच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे. इ.स. १६६५ मध्ये याच दिवशी झालेल्या पुरंदरच्या तहामुळे शिवरायांना २३ किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले. त्या यादीत कर्नाळा किल्ल्याचाही समावेश होता. इतिहासाच्या पुस्तकात ही माहिती दोन ओळीत वाचून पुढे जाता येते; पण कर्नाळ्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर त्या दोन ओळींचे वजन वेगळेच जाणवते. समोर उभा असलेला सुळका, त्याच्या भोवती पसरलेले जंगल आणि डोंगरकड्यांवरून फिरणारा वारा यांच्यामध्ये कुठेतरी स्वराज्याच्या त्या अस्थिर काळाच्या आठवणी अजूनही दडलेल्या आहेत, असे वाटते. कर्नाळ्याची वाट धरली की सर्वप्रथम लक्ष वेधून घेतो तो त्याचा वैशिष्ट्यपूर्ण सुळका. मुंबई गोवा महामार्गावरून जाताना तो अनेकदा नजरेस पडतो. दूरून दिसणारा हा डोंगर जवळ गेल्यावर मात्र अधिकच रांगडा आणि भव्य वाटू लागतो. डोंगराच्या कुशीत शिरताच शहराचा गोंगाट मागे राहतो आणि निसर्ग आपल्याशी हळूहळू संवाद साधू लागतो. कर्नाळा अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतरची पायवाट म्हणजे...