उत्खनन : मातीच्या थरांत दडलेला इतिहास
माणसाची स्मरणशक्ती मर्यादित असते. पण मातीची स्मरणशक्ती विलक्षण असते. ती हजारो वर्षांच्या घटना, संस्कृती, व्यापार, राजकारण आणि माणसांच्या जीवनपद्धती आपल्या थरांमध्ये जपून ठेवते. या स्मृती वाचण्याचं काम उत्खनन करतं. त्यामुळे उत्खनन म्हणजे केवळ खणकाम नव्हे, तर भूतकाळाशी साधलेला वैज्ञानिक संवाद आहे. आज पुरातत्त्वशास्त्रात उत्खनन ही अत्यंत शिस्तबद्ध प्रक्रिया मानली जाते. परंतु सुरुवातीच्या काळात उत्खननाचा उद्देश अनेकदा केवळ मौल्यवान वस्तू मिळवणे इतकाच होता. बॅबिलोनचा राजा नबोनिडस याने इ.स.पूर्व सहाव्या शतकात मंदिराच्या पायाचे उत्खनन केल्याची नोंद इतिहासात आढळते. पुढे इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस आणि भारतातील उत्खननांनी पुरातत्त्वशास्त्राला नवी दिशा दिली. भारतात सर जॉन मार्शल यांनी हडप्पा आणि मोहेंजोदडोच्या उत्खननातून सिंधू संस्कृती जगासमोर आणली आणि भारतीय इतिहासालाच नवं परिमाण मिळालं. उत्खननाची सुरुवात कुदळ किंवा फावड्याने होत नाही. ती नियोजनाने होते. कोणते स्थळ निवडायचे, किती क्षेत्रात उत्खनन करायचे, प्रत्...