सह्याद्रीच्या जखमा : माळीणपासून इर्शाळवाडीपर्यंत...
३० जुलै २०१४. पावसाची एक साधी सकाळ. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात दिवस उगवण्याची चाहूल लागली होती. घराघरांत चुली पेटण्याआधीच डोंगराने एक भीषण उसासा टाकला आणि काही क्षणांत संपूर्ण गाव मातीच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली गाडले गेले. शेकडो जीव, स्वप्ने आणि आठवणी एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्या. या दुर्घटनेला आता बारा वर्षे होत आली. पण प्रत्येक पावसाळ्यात सह्याद्री पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतो. आपण माळीणकडून काही शिकलो का? दुर्दैवाने उत्तर समाधानकारक नाही. माळीणपूर्वी महाड जवळील दासगाव आणि माळीणनंतर तळीये, इर्शाळवाडी आणि सह्याद्रीतील अनेक भागांत दरडी कोसळण्याच्या घटना घडतच राहिल्या. प्रत्येक वेळी आपण काही दिवस हळहळ व्यक्त करतो, मदतकार्य करतो आणि नंतर सर्व काही विसरून जातो. मात्र सह्याद्री विसरत नाही. तो आपल्या जखमा दरवर्षी पावसाच्या रूपाने पुन्हा उघड करतो. दरड कोसळणे ही केवळ नैसर्गिक घटना नाही. ती निसर्ग आणि मानवी हस्तक्षेप यांच्यातील बिघडलेल्या संतुलनाची प्रतिक्रिया आहे. लाखो वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखी...