देवदिवाळी: देवांची आणि मनुष्याची...!
आषाढी आणि कार्तिकी ह्या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या. याच दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास (चतुर्मास) पाळला जातो. याच काळात कर्क संक्रांतीस सूर्याचे उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास सुरुवात होते. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. थोडक्यात कर्क संक्रांतीपासून देवांची रात्र चालू होते. साधारणपणे कर्क संक्रांत येते आषाढ मासात. याच मासात रात्र असल्याने ‘देव झोपी जातात’, अशी समजूत आहे. म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते. तर कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोपेेेेतून जागे होतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी एकादशी’ किंवा ‘देवोत्थानी एकादशी’ असे म्हणतात. तसे पाहता दक्षिणायन सहा महिन्यांचे असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी; पण कार्तिकी एकादशीपर्यंत चारच महिने होतात. म्हणजे, एका अर्थाने दिवस उजाडायच्या आतच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात. या काळात श्रीविष्णू निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते.भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करण्याचा हा काळ. त्यामुळेच आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा होतो. कार्तिकी एकादशी नंतर येणारी पहिली प्रतिपदा ही मार्गशीर्ष महिन्यातील. यावेळी देवांची रात्र संपल्यामुळे देवभूमीवरील हा आनंदोत्सवाचा दिवस ठरतो. त्यामुळे या प्रतिपदेला देवदिवाळी म्हणतात. ‘मासानाम् मार्गशीर्षोSहमस्मि' असे भगवान श्रीकृष्ण भगवदगीतेमध्ये सांगतात. सर्व मासात मार्गशीर्ष मास श्रेष्ठ असा याचा अर्थ. याच मार्गशीर्षाच्या प्रतिपदेला हा सण येतो. या दिवसापासून खंडोबाचा उत्सव सुरू होतो. पंचांगांमधून ‘देव दीपावली’ असा उल्लेख असतो. आपले बरेचसे सर्व व्यवहार देवांवर कल्पिण्याच्या प्रघातामुळे, माणसांप्रमाणे देवांच्या दिवाळीची कल्पना आली असावी.
रायगड जिल्हा हा तसा कृषीप्रधान. शेती आणि पशुपालन हे पूर्वापार चालणारे व्यवसाय. अन्न गोळा करणारा समाज सहसा देवीची उपासना करतो, तर देवाचा उगम पशुपालक समाजात होतो. जिल्ह्यातील बहुसंख्य लोक या दोन्ही प्रकारातले. त्यामुळे कुलदैवत म्हणून खंडोबा, भवानी यांसह मातृदेवता, ग्रामदेवता या सर्वांनाच मान मिळतो. तांदूळ हे इथले मुख्य पीक. दुबार शेतीचा अपवाद वगळल्यास भातशेतीचा हंगाम जून ते ऑक्टोबर पर्यंतचा. ऐन दिवाळीच्या काळात भातकापणीस सुरूवात होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिवाळीचा काळ हा प्रचंड कामाचा असतो. पर्यायाने धान्य घरात आल्यानंतरच त्याच्या घरी ‘दिवाळी’ होते. यामुळे सामान्य शेतकऱ्यांसाठी नोव्हेंबर महिन्याच्या आसपास येणारी ‘देवदिवाळी’ निवांतपणे, सढळहस्ते साजरी करता येते.
जिल्ह्याच्या मध्य आणि दक्षिण भागात देवदिवाळी उत्साहात साजरी होते. रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर तालुक्यांत थोड्या फार साम्य-भेदाने देवदिवाळी संपन्न होते. देवदिवाळी हा सण म्हणजे आपल्या कुलदैवताला, ग्रामदैवताला व उपास्यदेवतेला भजण्याचा दिवस. आपले कुलदैवत आणि इष्टदेवता यांच्याबरोबरच स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता अन् गावातील अन्य मुख्य आणि उपदेवता यांचे, तसेच महापुरुष, वेतोबा या निम्नस्तरीय देवता यांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोहोचविण्याचे कर्तव्य या दिवशी पार पाडले जाते. पक्वान्नांचा महानैवेद्य दाखविला जातो. या दिवशी दक्षिण रायगड परिसरात वडे व घारग्याचा नैवेद्य दाखवला जातो.
‘कोंबडी-वडे’ हा या दिवशीचा खास आहार. विशेष बाब म्हणजे सर्व देवांचे नैवेद्य वेगवेगळ्या पानांवर दाखवले जातात. त्याबरोबर पितरांकरता नैवेद्याचे पान करून त्याचा पण नैवेद्य दाखवतात. यातील कुलदैवताच्या नावाने दाखवलेल नैवेद्याचे पान हे घरात प्रसाद म्हणून घेतले जाते आणि इतर सर्व नैवेद्याची पाने ही घराबाहेर गुरवास दिली जातात अथवा गाईस घातली जातात. माणगांव तालुक्यात देवदिवाळीत बैलांना गावाच्या वेशीबाहेर नेऊन नाचवण्याची प्रथा आहे. गावातील लहान मुले वेशीबाहेरील झाडाजवळ बैलाला बांधून त्याला सजवतात. त्यानंतर त्याला खेळवून आनंद घेतात. यावेळेस बैल उधळल्यास मात्र सर्वांची पांगापांग होते.
या सणाला काही ठिकाणी ‘बैलांची झुंज’ लावली जाते. नेहमी एकमेकांशी भांडणारी माणसे या दिवशी प्राण्यांच्या भांडणाचा आनंद लुटतात. महाड, पोलादपूर तालुक्यांत देवदिवाळीच्या निमित्ताने ‘रेड्यांच्या झुंजींचे’ आयोजन केले जाते. खास लढण्यासाठी पोसलेले रेडे वाजत गाजत खुल्या आखाड्यात उतरवले जातात. गुलाल उधळून, हाकारे करून त्यांना झुंजण्यास भाग पाडले जाते. यात ‘तुमचा खेळ होतो पण, आमचा जीव जातो’ अशी स्थिती या प्राण्यांची होते. काही प्राणीमित्र संघटना, जागृत नागरिकांमुळे ही मानवी (अपाशवी!) प्रथा थांबवण्यात थोडेफार यश आले आहे.
देवदिवाळीसारखे सण हे लोकांना एकत्र करतात. आपल्या मातीपासून, कुळापासून दूर असलेल्या लोकांना काही काळासाठी का होईना पण जवळ आणतात. गांजलेल्या, थकलेल्या सामान्याच्या जीवनात चैतन्य निर्माण करतात ही बाब निश्चितच चांगली आहे. या सणांतही कालसुसंगतपणा आणि थोडी विवेकदृष्टी स्विकारली तर आपल्या वर्तणुकीने कदाचित आपला परिसराचा स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. असे झाल्यास खऱ्या अर्थाने देवांची दिवाळी साजरी होऊ शकेल; या पृथ्वीवरच्या स्वर्गात!
- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)