‘अज्ञात’ मराठी वीर दौडले सात

‘अज्ञात’ मराठी वीर दौडले सात!
     १९१८ सालातल्या नोव्हेंबर महिन्यातला अकरावा दिवस. सकाळी १० वाजून ५९ मिनिटे झाली असताना एक अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगनच्या माऱ्याला बळी पडला. त्याच्या मृत्यूनंतर  मिनिटाभरातच सर्व युरोपभर युद्ध बंदी लागू झाली. सव्वा चार वर्षे अविरत चाललेले हे विनाशकारी युद्ध संपले. युरोपमधील चर्चमधून घंटानाद करून ही बातमी जनतेला कळवली गेली.
गेली दोन वर्षे बंद असलेल्या लंडनच्या प्रसिद्ध बिग बेन या घड्याळाने सकाळी ११.०० वाजता पुन्हा एकदा टोल दिले. सर्व युरोपभर शांतता पसरली; अर्थातच काही काळापुरती. हा घटनाक्रम आहे पहिल्या महायुद्धाचा. या महायुद्धात एकूण २४ लहान मोठ्या देशांनी सक्रीय सहभाग घेतला. अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडातील कुठला न कुठला देश ह्या युद्धात सामील होता. युद्ध संपे पर्यंत ह्यात दोन्ही बाजूचे मिळून साधारणपणे दीड कोटीहून अधिक लोक मरण पावले तर त्याहून अधिक लोक जखमी झाले. शंभर वर्षापूर्वीचा काळ पाहता ही आकडेवारी भीषण आहे. पहिल्या महायुद्धाचा खर्च तब्बल ३३८ अब्ज डॉलर्स झाला. तोही १९१८ मध्ये. २०१९ मध्ये हा खर्च काढायचा झाल्यास किती होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. या युद्ध समाप्तीला नोव्हेंबर महिन्यात १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. खरेतर आपल्यापासून दूर असलेल्या युरोप नावाच्या खंडात घडलेले हे युदध; पण तरीही या युद्धाबद्दल आपण भारतीयांनी का जाणून घ्यायला हवे ?

विशेषत: रायगडवासियांनी?

      पहिल्या महायुद्धाच्या रायगड कनेक्शनसाठी आपण जिल्ह्याच्या दक्षिण टोकाकडील पोलादपूर तालुक्यात जाऊ. इथे लहान लहान टेकड्यांनी वेढलेला ‘तुर्भे’ नावाचा परिसर आहे. तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द, खोंडा, वझरवाडी, देऊळवाडी, कलमवाडी यांसारख्या वस्त्यांनी बनलेला हा भाग. इथल्या देऊळवाडी व कलमवाडी जवळील लहानशा टेकडीवजा भागात एक स्तंभरुपी दगडी वास्तू पहायला मिळते.
सममित आकारातील हा स्तंभ मजबूत चिऱ्यांनी बनलाय. स्तंभावर एक आकर्षक संगमरवरी पाटी असून पाटीवर वरच्या बाजूस ‘TURUMBE KHURD’ अर्थात ‘तुरुंबे खुर्द’ असे ठळकपणे लिहिले आहे. त्याखालोखाल दोन कमळपुष्प असलेले तारकाचिन्ह आहेत. ब्रिटीश युद्ध परंपरेतील ‘स्टार’ आणि भारतीय कलेतील समृद्धतेचे चिन्ह ‘कमळ’ असा अनोखा संगम या रचनेत आहे. संगमरवरी पाटीच्या मध्यवर्ती भागात कमानयुक्त नक्षी असून त्यात सुरूवातीस गॉथिक शैलितील GRI असे चिन्ह कोरले आहे.
GRI चे पूर्ण रुप Georgius Rex Imperator असे असून ते पाचव्या ‘किंग जॉर्ज’च्या सन्मानार्थ वापरले जात असे. पुढे काही ओळी कोरलेलेया असून  महत्त्वपूर्ण नोंदींप्रती असलेली ब्रिटीशांची सजगता या स्तंभावरील लेखाने दिसून येते.

“FROM
THIS VILLAGE
83 MEN
WENT TO THE
GREAT WAR
1914-1919
OF THESE 7
GAVE UP
THEIR LIVES”

वरील ओळींनुसार, या गावातून ८३ लोक ‘ग्रेट वॉर’ मध्ये सहभागी झाले त्यापैकी सात जणांनी आपले प्राण गमावले.
यात उल्लेखलेला ‘ग्रेट वॉर’ म्हणजे पहिले महायुद्ध. १९२० पर्यंत पहिल्या महायुद्धाचा उल्लेख ‘ग्रेट वॉर’ किंवा ‘World War’ एवढाच व्हायचा. ‘लंडन टाइम्स’चा वार्ताहर रेपिंग्टन याने सर्वप्रथम ‘First World War’हा शब्द वापरला.(बहुधा भविष्यात दुसरे महायुद्ध होऊ घातल्याची जाणीव त्याला झाली असावी.) या सर्व विश्लेषणातून एक गोष्ट लक्षात येते की या गावातून मोठ्या संख्येने लोक पहिल्या  महायुद्धात सहभागी झाले होते.  तुर्भे परिसराप्रमाणेच देशाच्या विविध भागातून जर्मन आघाडीविरूद्ध लढण्यासाठी भारतीय सैन्य वापरण्यात आले. ही संख्या लाखांच्या घरात आहै. त्यापैकी साठ हजाराहून अधिकांनी प्राण गमावले तर सत्तर हजारांच्या आसपास सैन्य जखमी झाले.
     लेखन साहित्याच्या बाबतीत तर पहिल्या महायुद्धाने दुसऱ्या महायुद्धावर मात केली आहे. पहिल्या महायुद्धावर खूप सैनिकांनी कविता केल्या. जणू कवींची फौजच उभी राहिली. यात  कवी रूपर्ट ब्रुक, विल्फ्रेड ओवेन, सिफ्रिड ससून यांचा समावेश आहे.

यापैकी रूपर्टची एक कविता खूप गाजली

“If I should die, think only this of me:
That there's some corner of a foreign field
That is for ever England.”

‘जर मी लढाईत मरण पावलो तर एवढी आठवण ठेवा, की परदेशात कुठेतरी एक कोपरा आहे- जिथे माझ्या थडग्याच्या रूपाने इंग्लंड सदैव आहे..’

    असे अनेक वीरजवान आपल्या मृत्यूच्या तयारीनेच रणमैदानात उतरले होते. युरोपात कित्येक हजार एकर जमीन अशा सैनिकांच्या स्मशानभूमीसाठी वापरण्यात आली. पोलादपूर तालुक्यातून चौदा जणांच्या वीरमरणाची नावानिशी नोंद काही कागदपत्रांमध्ये आढळते. परंतु तुर्भे खुर्द येथील स्मारकावरील सात अज्ञात विरांचा शोध अजूनही बाकी आहे. कदाचित रुपर्ट म्हणतो त्याप्रमाणे जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात हे मराठी भूमितील सात अज्ञात वीर चिरनिद्रा घेत शांतपणे पहुडले असावेत.
परदेशात सैनिकांच्या स्मारकाच्या जागेची बागेप्रमाणे उत्तम निगा राखली जाते, या स्थळांना सन्मान दिला जातो. युरोपातील एका देशात तर चक्क लग्न झाल्यावर वधू-वर सर्वप्रथम सैनिकांच्या स्मारकाला भेट देतात असल्याचे सांगीतले जाते. परंतु ब्रिटीशांच्या दूरदृष्टीने बांधलेल्या तुर्भे येथील स्मारकाच्या नशिबी आपली इतिहासविषयक ‘धूरदृष्टी’ आली. अज्ञानाच्या धुरकटपणामुळे हे स्मारक सुरूवातीस सपशेल दुर्लक्षिले गेले. पण ब्रिटीशकालीन बांधकाम आणि काही जागृत नागरिकांमुळे हा स्तंभ महायुद्धाच्या स्मृती जपत उभा आहे. ही वास्तू आणि या विरांच्या स्मृती अशाच चिरंतन राहो हीच अपेक्षा.

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Comments

Popular posts from this blog

पाचवीला पुजलेली सटी

चुलीवरचे जेवण!

शिलाखंडांचे ताम्रपट