‘निरा’ हे सदा के लिए!
श्रीस्थानक अर्थात सध्याचे ठाणे ही उत्तर कोकणच्या शिलाहारांची राजधानी. या राजवंशातील ‘छित्तराजा’चा मुरूडजवळील भोईघर येथे सापडलेला एक ताम्रपट आहे. इसवी सन १०२४च्या या ताम्रपटात नारळ, फणस, चाफा, आंबा यांवरील कर पद्धतीची माहिती दिली आहे. या ताम्रपटातील एका वाक्याची अंमलबजावणी अगदी हजार वर्षानंतरही कायम आहे. ही ओळ अशी आहे- ‘सुरामण्डवृक्षश्चाभ्यन्तरवर्ती बाह्यो वा राजकीय एव’ म्हणजे, ‘ज्या वृक्षांपासून ‘सुरा’ अर्थात दारू निघते, ते सर्व वृक्ष बाहेर असोत वा आत, राजाच्या/सरकारच्या अखत्यारीत आहेत!’ अलिकडच्या काळातील सुप्रसिद्ध ‘सरकारमान्य’ या शब्दाचा उगम अशाच आदेशांमध्ये असल्याचे सांगता येईल. आधुनिक काळातही ताड, माड, खजूर, शिंदी यांसारखे तालवृक्ष सरकारच्या अखत्यारीत येतात. पर्यायाने या वृक्षांशी निगडीत व्यवसायांवर देखील सरकारची नजर असते. आपणही इथे अशाच एका सुरावृक्षाशी संबंधित ‘सरकारमान्य’ व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत; फरक इतकाच की- आपण ‘सुरे’च्या वाकड्या मार्गात न शिरता सरळमार्गाने ‘निरा’ व्यवसायाकडे वळणार(!) आहोत. उन्हाच्या दिवसांमध्ये प्रवास करताना रस्त्याच्या कडेला...