शिवायविष्णुरूपाय : एक शिल्पकथा

शिवायविष्णुरूपाय : एक शिल्पकथा


    मुंबईच्या उत्तरेला पश्चिम रेल्वे मार्गावरील एक गजबजलेले उपनगर म्हणजे नालासोपारा. भारताच्या जवळपास सर्व राज्यांतील (काही परराष्ट्रातील सुद्धा) माणसे इथे आढळू शकतील इतकी विविधता इथल्या लोकसंख्येत आहे. खरे तर नाळा आणि सोपारा अशी दोन स्वतंत्र गावे इथे आहेत. एका मान्यतेनुसार ही मूळची परशुरामाने निर्माण केलेली भूमी. याचे प्राचीन नाव शूर्पारक. कोणे एके काळी हे शहर एक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर आणि कोकण प्रांताच्या राजधानीचं शहर म्हणून वैभवाने भरलेलं होते.  स्वत: गौतमबुद्धांनी या परिसराला भेट दिली असंही सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवसायाची बाजारपेठ म्हणून शूर्पारक बंदर जगप्रसिद्ध होते. इथून परदेशात मोठा व्यापार चालत असे. इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत शूर्पारक नगरी कोकण प्रांताची राजधानी होती. सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र आणि मुलगी संघमित्रा हे बुद्धगयेहून आणलेली महाबोधी वृक्षाची फांदी घेऊन याच बंदरातून श्रीलंकेला गेले होते. त्यानंतरच जगभर बौद्धधर्माचा प्रसार सुुरु झाला. या प्राचीन नगरीचा इतिहास सांगणाऱ्या वस्तू अजूनही जागोजागी आढळतात. वसई परिसरातील गास, निर्मळ, सोपारा, तुंगारेश्वर या स्थानांवर प्राचीन बांधकामे, मूर्ती, वस्तू मोठ्या संख्येने आढळतात. सोपाऱ्याच्या चक्रेश्वर तलाव आणि परिसरात सापडलेल्या काही मूर्ती महादेव मंदिरात आणि मंदिराबाहेर ओळीने ठेवलेल्या आहेत. या शिल्पांमध्ये हिंदू, जैन, बौद्ध अशी विविधताही आहे. गास या गावातील शेतात सापडलेले ‘ब्रम्हदेवाचे शिल्प’ हा या कलाकृतींचा उच्चस्तरीय नमुना. तसे पहायला गेलो तर ही सर्व शिल्पे म्हणजे केवळ दगडच, परंतु कोणा अज्ञात कलाकारांच्या हत्यारांतून ही मूक  शिल्पे हजारो वर्षांचा इतिहास कथन करतात. ओळीने रचलेल्या या शिल्प रांगामधील वरकरणी सामान्य भासणारे व सहसा कोणाचे लक्ष न वेधणारे एक शिल्प मात्र एक वेगळी परंपरा आपल्यासमोर मांडते.
दोन भक्तीमार्गांना, परंपरांना एकत्रित आणणारी ही मूर्ती आहे तरी कसली?

    चक्रेश्वर महादेव मंदिराच्या उत्तर दरवाजातून बाहेर पडल्यानंतर भव्य ब्रम्हमूर्तीचे दर्शन होते. या शिल्पाच्या उजव्या हाताला एक स्थानक म्हणजेच उभ्या स्थितीतील सुमारे चार फूट उंचीची पाषणमूर्ती कुंपणाच्या आधाराने ठेवलेली आहे. दोन्ही पायांवर सारखा तोल साधून शरीर कुठेही न वाकवता ताठ उभी असलेली, तसेच दृष्टी समोर असलेली ही मूर्ती आहे. मूर्तीकलेच्या परिभाषेत अशा मूर्तीला ‘समभंग’ मूर्ती म्हणतात. सहसा विष्णू, शीव, सूर्य व लक्ष्मी या मूर्ती समभंगात असतात. शिल्पाची थोडीफार झीज झाली असली तरी मुखावरील सौम्य भाव व योगारूढ स्थितीतील सात्विकता स्पष्टपणे जाणवते. मूर्तीचे हात भग्न झालेले आहेत. मूर्तीच्या पार्श्वबाजूस लंबवर्तुळाकार प्रभावलय दर्शवण्यात आले आहे. अधिक बारकाईने  निरीक्षण केल्यास मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या भागांमध्ये सूक्ष्म फरक असल्याचे जाणवते.


 हा सूक्ष्म भेद सर्वप्रथम लक्षात येतो तो मूर्तीच्या डोक्यावरील मुकुटावरून. डाव्या बाजूकडील मुकुट  खालून वर निमुळते होत गेले असून रत्नजडीत आहे. त्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. अशा मुकुटला ‘किरीट मुकुट’ म्हणतात. विष्णू, सूर्य, कुबेर अशा देवतांच्या माथी हा मुकुट दाखवला जातो. उजव्या भागातील मुकुट खूपच वेगळे असून त्यात मस्तकावरील केशसंभार उंच मुकुटाप्रमाणे धरून बांधलेला आहे. या रचनेला ‘जटामुकुट’ म्हणतात.

सामान्यत: ब्रम्हा व शीव यांच्या माथी असा जटामुकुट असतो. या मुकुटामध्ये आभूषण म्हणून चक्क नररुंड म्हणजे मानवी कवट्या साकारल्या आहेत. या सर्व रचनेवरून मूर्तीचा उजवा भाग शिवरूप असून, डावीकडील भाग विष्णूरुप असल्याचे समजून येते. या निष्कर्षाला बळकटी देणारी आणखी काही लक्षणे या शिल्पात आहेत. शिव बाजूच्या पायाजवळ नंदी आहे.
सहसा विष्णू मूर्तीत आढळणारा जानव्यासारखा उदरापर्यंत येणारा ‘चेन्नवीर’ नावाचा अलंकार मूर्तीच्या डाव्या बाजूस आहे. दोन्ही खांद्यांवरून गुडघ्यापर्यंत लोंबणाऱ्या माळेतील खालचा भाग सुस्थितीत आहे. त्याच्या शिव भागाकडील माळेत नररुंड असून विष्णूरुपाकडे पुष्पमाला असल्याचे दिसते.
मूर्तीचे हात भंगले असल्याने त्यांच्या हातातील आयुधे, उपकरणे याविषयीची माहीती मिळत नाही, परंतु एकूण रचनेचा विचार करता या देवतांच्या प्रिय वस्तू त्या हातांमध्ये असाव्यात. शिव आणि विष्णू या दोघांच्या अशा एकत्रित मूर्तीला ‘हरिहर मूर्ती’ म्हणतात.  म्हणजेच चक्रेश्वर महादेव मंदिराजवळील ही दुर्मिळ मूर्ती हरिहराची आहे . या शिल्पामध्ये असे अनेक सूक्ष्म भेद असले तरी एकत्रितपणे पाहताना हे भेद एकरूप झाल्याचे दिसतात. शैव आणि वैष्णव वेगळे भासत असले तरी ते एकच आहेत हे या शिल्पातून सुचवणाऱ्या या कलाकाराचे कौशल्य अद्वितीय आहे.
      कंबोडीया येथील शिलालेखांमध्ये या एकत्रिकरणासाठी शम्भू-विष्णू, शंकर-अच्युत, हर- अच्युत, परमेश्वर-सारंगी, विष्णू-ईश, हरी-शंकर आणि हरी-ईश्वर  असे उल्लेख आले आहेत.  हरिहर हे शिव आणि विष्णू या दोन स्वतंत्र सिद्धांतांवर आधारित देवतांचे एकीकरण दाखवणारे स्वरूप आहे. असे स्वरूप त्या काळातील समाजधुरिण तत्वज्ञांना निर्माण करावे लागले. आपल्या भारतीय परंपरेमध्ये शैव आणि वैष्णव पंथ हे पूर्वीपासून त्यांच्या स्वतंत्र तत्त्वज्ञानावर चालत आले आहेत. पण या पंथामध्ये कालांतराने वाढत गेलेले मतभेद कुठेतरी थांबवणे, ही तत्कालीन समाजाची गरज बनली. या गरजेपोटी दोन्ही देवतांचे महाविलयन झाले.शिव-पार्वतीच्या अर्धनारीश्वरच्या धर्तीवर हरिहर संकल्पना विकसित होताना दिसते. याचे पुरावे वायूपुराण, शिवपुराण यांसारख्या पुराणांच्या आधारे पडताळता येतात. वायू पुराणात शिव आणि विष्णू या दोनही देवतांचा तितकाच सन्मान केला गेला आहे. विश्व उत्पत्तीचे मूळ शिवाला मानले आहे तर विष्णूच्या सूक्ष्म रूपात सर्वत्र असल्याचा उल्लेख आहे. विष्णू प्रकृती आणि शिव पुरूष असे स्वरूप मानले आहे. त्यामुळे हरिहर मूर्तींमध्ये शिवाच्या वाम बाजूला जी अर्धनारीश्वर मध्ये पार्वतीची बाजू आहे त्या बाजूला, विष्णू अंकित करतात.

एका श्लोकाद्वारे हरिहर स्वरूपाचे वर्णन केले आहे.
शिवायविष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे ।
शिवस्य हृदयं विष्णुर्विष्णोश्च हृदयं शिवः॥8।।
ईशादिविंशोत्तरशतोपनिषदः (51- 60.8 )

अर्थात शिव म्हणजेच विष्णूचे रूप आणि विष्णू म्हणजेच शिवाचे रूप आहे. शिव विष्णूच्या हृदयात आहे आणि विष्णू शिवाच्या. या एकात्मिक तत्त्वावर  हरिहर मूर्तीची संकल्पना मूर्त रूपात साकार झालेली आपल्याला दिसते. यातून पुढे अर्धशिव आणि अर्धविष्णू यांचा संयोग घडविणारा हरिहर पंथ निर्माण झाला. परंतु याचे आयुष्य अल्प होते आणि अकराव्या शतकानंतर तो फारसा प्रचलित राहू शकला नाही. हरि आणि हर यांच्या उपासकांचे हितसंबंध फार भिन्न होते आणि त्यातून स्मार्त-वैष्णव संघर्ष होत राहीले. कालानुरूप या जाणिवांमध्ये बदल होतच राहीले. प्राचिन काळातील वस्तूंमधून पुरातन  इतिहास समोर येत राहतो.
सोपाऱ्यातल्या अशा प्रत्येक शिल्पामागे एक रंजक कथा आहे. परंतु उनपावसाच्या कचाट्याने आणि आपल्या झापडबंद दुर्लक्षामुळे या शिल्पांची नासधूस होऊन हा कथासंग्रह फाटू लागलाय. त्यातील महत्त्वपूर्ण पाने गहाळ होऊ लागलीत. थोडी इतिहासाबद्दलच्या जागृततेची लहानशी संजीवनी या वस्तूंवर पडली तर ही शिल्पे बोलू लागतील, तुमच्याशी सुद्धा!

संदर्भ: भारताची मूर्तीकला- पं.महादेवशास्त्री जोशी, पुराणकथा आणि वास्तवता- दामोदर कोसंबी, वसईच्या इतिहासाची साधने- श्रीदत्त राऊत

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

Comments

Popular posts from this blog

पाचवीला पुजलेली सटी

चुलीवरचे जेवण!

शिलाखंडांचे ताम्रपट