मणभर काम, गुंजभर दाम

मणभर काम, गुंजभर दाम!



लहान बोटीत दाटीवाटीने नेहमीचे प्रवासी बसलेले.  कामानिमित्ताने समुद्रमार्गाने मुंबईला ये-जा करणारी ही गर्दी. या नेहमीच्या गर्दीपेक्षा एक वेगळा चेहरा बोटीत चढतो. त्याच्या हातात स्वत:च्या आकाराहून मोठ्ठं पोतं आहे. एकीकडे गर्दीच्या चालण्याने ओल्या झालेल्या डेकपासून पोतं वाचवण्याचा प्रयत्न तो करतोय, तर दुसरीकडे कडक इस्त्रीची गर्दी त्याच्या पोत्याच्या स्पर्शापासून वाचण्याचा प्रयत्न करतेय. भाऊच्या धक्क्याला बोट लागल्यानंतर हे पोतं मुंबईच्या ‘नळ बाजारात’ पोहोचवलं जाईल. तिथल्या एका डीलरसोबत घासाघीस करून हाती काही पैसे मिळतील. या मणभर पोत्याच्या तुलनेत मिळालेल्या गुंजभर रक्कमेत ‘जीवाची मुंबई’ करत ही व्यक्ती मुंबईपासून जवळ असणाऱ्या ग्रामीण बाज जीवंत असणाऱ्या आपल्या जगात आनंदाने पोहोचतो.

काय होतं त्याच्या मोठ्या पोत्यात?

   मुंबईच्या नळबाजारात विकल्या गेलेल्या या पोत्यात होता, ‘गुंजेचा पाला’. ग्रामीण भागात ‘ गुंजवली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीची ही इवलीशी पाने. पानाच्या ठेल्यावर मिळणाऱ्या विड्यामध्ये गोडवा येण्यासाठी चिंचेसारखी लहान पाने असतात ती गुंजेचीच असतात. सुंगधी बडीशेपमध्येही ही पाने वापरतात. मिंटसारखी गोड चव या पाल्याला असते. जुन्या काळात जेव्हा लोकांना आपल्या घरी माणसे आलेली आवडायचे तेव्हा त्यांच्या आदरातिथ्यासाठी घरोघरी पानाचे डब्बे असायचे. या डब्यातील एक खण गुंजेच्या पाल्यासाठी राखीव असायचा.

ही ‘गुंज’ वनस्पती असते कशी आणि तिचा पानाच्या डब्ब्यापर्यंतचा प्रवास कसा होतो?



    ‘गुंज’ किंवा ‘गुंजा’ ही सामान्यत: उष्णकटिबंधात आढळणारी वनस्पती आहे. तसेच विरळ दमट जंगलांत सापडते. लाल आणि पांढरी असे दोन प्रकार यात आहेत.  गुंज ही दुसऱ्या वनस्पतीच्या आधाराने साधारण पाच ते सहा मीटर पर्यंत वाढते. इंग्रजीमध्ये रोझरी पी(Rosary Pea) या नावाने ओळख असणाऱ्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Abrus precatorius असे आहे. गुंजेची वेल सहसा पावसाळी उगवते. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये गुंजेला फुल येतात. ही फुले फिक्कट गुलाबी रंगांची असतात. फुलांना नंतर शेंगा येतात. कोवळ्या शेंगा दिसायला छान वाटतात. ह्या शेंगा ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये सुकुन फुटतात आणि त्यातुन शेंदरी-काळे असे मोत्यासारखे गुंज बाहेर पडतात. काही ठिकाणी या बियांना बाहुलीचे डोळे म्हणतात. पूर्वीच्या काळी, सोन्याचे वजन करताना गुंज हे परिमाण वापरले जायचे. गुंजेच्या वजनात नेहमी सातत्य असते. साधारणत: एक गुंज म्हणजे तोळ्याचा शहाण्णववा भाग. गोड पानांच्या या वनस्पतीच्या बिया मात्र विषारी असतात. आयुर्वेदिक उपचारांमध्ये जेष्ठमधा ऐवजी गुंजेची मुळी वापरत येते. ह्याची पाने चिंचेसारखी असतात.पाने संयुक्त व समदली असतात. गुंजेची वेल रानावनांत आढळत असल्याने या पानांसाठी जंगलाची वाट तुडवावी लागते. गुंजेची लहान पाने गोळा करणे शक्य नसते, त्यामुळे वेली गोळा करून घरी आणल्या जातात. या वेली अंगणात किंवा मोकळ्या जागेत वाळवल्या जातात. वाळल्यानंतर वेलीचे आकारमान आणि वजन कमी होते. त्याची पाने गळून वेगळी गोळा करता येतात. या सुकलेल्या पानांची रवानगी आपल्या ‘भल्या मोठ्या पोत्यात’ होते. पहिल्या फेरीत आणलेल्या पाल्याने जेमतेम दहा बारा टक्केच पोतं भरलं जातं. हा शेती पूरक व्यवसाय असल्याने शेतीच्या कामानिमित्ताने होणाऱ्या फेऱ्यांमध्ये हळूहळू हे पोतं भरलं जातं. मग सुरू होतो रिकाम्या पोटी या भरलेल्या पोत्याचा प्रवास. मुंबईच्या बाजारात पूर्वी किलोमागे अठरा ते वीस रुपये मिळायचे. सुक्या पानांनी भरलेल्या या मोठ्या आकाराच्या पोत्याचे वजन जेमतेम आठ ते दहा किलो भरायचे. महिनाभर केलेल्या मणभर कामाचे अक्षरश: गुंजभर दाम मिळायचे. अलिकडच्या काळात हा भाव किलोमागे दोनशे ते तिनशे रुपयांपर्यंत गेलाय. तरीही एकूण मेहनतीच्या तुलनेत ही रक्कम अत्यल्पच आहे. ही वनस्पती नैसर्गिकरित्या उगवत असल्याने पिकवणे ऐवजी ‘गोळा करणे’ हीच पद्धत अजून वापरली जाते. त्यातच जंगलाचे क्षेत्र कमी होत चालल्याने गुंजेचे अस्तीत्व धोक्यात आले आहे.



पानाचा स्वाद घेताना या गुंजेचा गोडवा कधी चाखलात, तर या पानांचा तुमच्या विड्यात पोहोचतानाचा प्रवास आठवा. जीभेवर गुंजभर गोडवा नक्कीच वाढेल.


- तुषार म्हात्रे

Comments

Popular posts from this blog

पाचवीला पुजलेली सटी

चुलीवरचे जेवण!

शिलाखंडांचे ताम्रपट