बेलापूरचा किल्ला: मराठ्यांच्या सागरी पाऊलखुणा
समुद्र म्हणजे विशालतेचं प्रतीक. लाटांच्या ओघात वाहणारी शांतता आणि आत दडलेली ताकद दोन्ही एकाचवेळी जाणवतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी या समुद्राची ताकद ओळखली आणि किनाऱ्याच्या प्रत्येक वळणावर आपले अस्तित्व उमटवले. मराठा साम्राज्य केवळ डोंगरदऱ्यांमध्ये नव्हे, तर लाटांवरही उभं राहावं, हे त्यांचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाच्या साक्षीदारांपैकी एक आहे... बेलापूरचा किल्ला. शिवाजी महाराजांनी थेट बेलापूर किल्ला जिंकला नसला तरी, त्यांनी उभारलेल्या आरमाराच्या आणि स्वराज्याच्या विस्ताराच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता, हे महत्त्वाचे आहे.
ठाणे जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला, पनवेल खाडीच्या किनारी वसलेलं बेलापूर हे गाव एकेकाळी सागरी व्यापाराचं केंद्र होतं. या खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आक्रमणांना रोखण्यासाठी पोर्तुगीजांनी इ.स. १५६० च्या सुमारास हा किल्ला उभारला. तो काळ समुद्रावर वर्चस्व गाजवणाऱ्यांचा होता. अरब, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज या सगळ्यांनी सागराच्या किनाऱ्याकडे लोभाने पाहिलं. परंतु नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने या समुद्राला स्वराज्याच्या सीमेचा भाग बनवलं.
शिवरायांना हे ठाऊक होतं की, “ज्याचे आरमार त्याचा समुद्र.” म्हणूनच त्यांनी गुराब, गलबत, मचवा, पाल अशी शेकडो जहाजं तयार करून एक स्वदेशी आरमार उभं केलं. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी, पद्मदुर्ग या जलदुर्गांच्या मालिकेत बेलापूर किल्लाही त्यांच्या सागरी धोरणाच्या चौकटीत बसतो. हा किल्ला मुंबई, ठाणे आणि रायगड यांच्या सागरी दळणवळणावर नियंत्रण ठेवणाऱ्या मार्गावर आहे, म्हणून त्याचं महत्त्व अधिक वाढतं.
इ.स. १७३३ मध्ये नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बेलापूरचा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकला. त्या काळच्या कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख “बेलापूरवर फिरंगी जेर जाहला” असा आढळतो. म्हणजेच हा किल्ला पुन्हा स्वराज्याच्या ताब्यात आला आणि मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचा भाग बनला. मराठ्यांनी येथून पनवेलच्या खाडीवरील हालचालींवर लक्ष ठेवून किनारपट्टी सुरक्षित केली.
किल्ल्याचं बांधकाम मजबूत तटबंदी आणि गोलाकार बुरुजांनी सजलेलं आहे. प्रवेशद्वारावरून आत शिरल्यावर दगडी पायऱ्यांची वाट वरच्या गडभागात नेते. तिथून संपूर्ण पनवेल खाडी, उरण व नवी मुंबईचा परिसर दिसतो. एका बाजूला बालकेश्वराचं प्राचीन मंदिर आणि दुसरीकडे समुद्रावर झुकणारा कड्याचा कडा, अशा दृश्यामुळे हा किल्ला केवळ सामरिक नव्हे तर सांस्कृतिक अर्थानेही महत्त्वाचा ठरतो.
आज किल्ल्याचे काही भाग भग्न अवस्थेत आहेत, पण त्याच्या प्रत्येक दगडात समुद्राच्या लाटांनी लिहिलेला इतिहास अजूनही वाचता येतो. ब्रिटिश काळात इ.स. १७५० नंतर हा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला, पण मराठ्यांच्या आरमाराने उभारलेल्या त्या समुद्री सामर्थ्याची छाया मात्र या किनाऱ्यावर कायम राहिली.
बेलापूरचा किल्ला म्हणजे फक्त विटा आणि दगडांची रचना नाही. तो एका कल्पनेचा पुरावा आहे की सत्तेचं केंद्र केवळ भूमीवर नव्हे तर पाण्यावरही असू शकतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी घडवलेला हा विचार आजच्या काळातही तितकाच प्रेरणादायी आहे.
नवी मुंबईच्या उंच इमारतींमधून दूर दिसणाऱ्या बेलापूरच्या टेकडीवर उभा असलेला हा किल्ला आज शांत आहे, पण त्याच्या शांततेत इतिहासाचा गजर दडलेला आहे. त्या तटावर उभं राहून जेव्हा आपण खाडीतील चमकत्या लाटा पाहतो, तेव्हा वाटतं, हाच तो समुद्र... ज्यावर शिवरायांनी स्वराज्याचा झेंडा फडकवला होता. आणि त्या झेंड्याची सावली आजही या किनाऱ्यावर दिमाखात उभी आहे.
- तुषार म्हात्रे
टिप्पण्या