धवलारीण
शेती व्यवसायाशी संबंधित सर्वच समाजांमध्ये सण, समारंभ साजरा करण्याचा दिवस, एकूण कालावधी शेतीकामांतून मिळणारी उसंत, उत्पादन यांवर अवलंबून असतो. भातशेती करणाऱ्या समाजाला कापणी, मळणीनंतर बऱ्यापैकी आराम मिळतो. बहुदा या कारणांमुळेच तुलसीविवाहानंतर विवाहोत्सुक उमेदवारांची लग्नकार्ये उरकली जातात. वधू, वर आणि घरच्यांची संमती या तीन घटकांचे एकमत झाले की पुढची तयारी सुरू होते. विवाहाचा अंदाजे दिवस ठरवताना आणखी एक महत्वाची बाब पाहीली जाते, ती म्हणजे या तारखेला विवाह सोहळा पार पाडण्यासाठी आवश्यक गोष्टींची उपलब्धता. यात लग्नाचा हॉल, मांडव, वाजंत्री, पुरोहीत, आचारी हे सर्व उपलब्ध होतील याची खात्री केली जाते. खारेपाटातल्या आगरी, कोळी समाजात मात्र, या सर्वांसह आणखा एका बाबीची खातरजमा केली ती म्हणजे, ‘धवलारीण उपलब्ध आहे का?
धवलारीण पारंपरिक पद्धतीने लग्नातील वेगवेगळ्या विधी पार पाडत असते, त्यामुळे तिच्याशिवाय लग्नसोहळा पार पडणे अशक्यच. एखाद्या पुरोहिताप्रमाणेच काम बजावणारी ‘धवलारीण‘ म्हणजे तरी नेमकं काय?
याचं एका वाक्यात उत्तर म्हणजे “धवले गाते ती धवलारीण!”
अशा वेळी पुन्हा प्रश्न येईल की, ‘धवले म्हणजे काय?’
“विवाहात गायल्या जाणाऱ्या वधुवर विषयकगीतांना 'धवले’ किंवा ‘धवळे’ असे म्हणतात”, अशी त्याची व्याख्या करता येईल. ‘धवळा’ किंवा ‘धवला’ हा मराठी गीतवाचक शब्द. संस्कृतमधील ‘धवल’ या शब्दाशी जवळीक साधणारा.
अकराव्या शतकात ‘हेमचंद्र’ नावाचा गुजरातमधील एक जैन साधू सुप्रसिद्ध होता. हेमचंद्रांनी व्याकरण, भाषाशास्त्र व काव्यशास्त्रात त्यांनी विपुल निर्मिती केली. त्यापैकी छन्दोनुशासन या काव्यविषयक ग्रंथात त्यांनी धवल या शब्दाची व्याख्या केली आहे. हेमचंद्राने केलेल्या व्याख्येनुसार, ‘‘ज्या गीतात सुपुरुषाचे वर्णन केले जाते, त्याला धवलगीत म्हणले जाते." आता ‘सुपुरुष’ या शब्दाला इथे ‘परमेश्वर‘ आणि ‘वर’ असे दोन अर्थ सांगितले आहेत.धवले जसे विवाहप्रसंगी गायिले जातात, तसेच ते भक्तांनी कौतुकाने साजऱ्या केलेल्या देवांच्या विवाहप्रसंगीही गायले जात. महानुभाव पंथातील महदंबा यांनी तेराव्या शतकात रचलेले एक सुंदर धवले आहे.
‘‘श्री चक्रधराचे सीरी धरौनिया श्रीचरणां |मग धवळी गाइनु गोविंद राणा॥
जेणे रुकुमीणी हरीएली | जेणे जगी पवाडे केले अती बहुतु ॥
पाविजे परमा गती | भक्ती आइकीतां श्रीकृष्णचरित्रु ॥”
नंतरच्या काळात संत एकनाथांनी रचलेले
‘‘लग्ना येरे दिसी उटणे मांडले | धवळे आरंभिले संभ्रमेसी ॥ धवळामाजी गाणी गाईले रामनाम | एकोनिया प्रेम बरा आले ॥” हे धवलेही ज्ञात आहे.
संत एकनाथ आणि दासोपंत यांनी रचलेली धवले धनश्री रागात आहेत.
धवल्यांचे मध्ययुगीन काळातले उल्लेख असूनही, आधुनिक काळातल्या धवल्यांची लिखित नोंद फारशी आढळत नाही, ही काहीशी आश्चर्याची बाब आहे. मौखिक स्वरूपामध्ये या ठेव्याचे हस्तांतर होत राहते, परंतु लिखित नोंद नसल्याने धवले गाण्याची पद्धत, त्याची शब्दरचना,विशिष्ट क्रम यांत विविधता आढळते. या विविधतेसह लग्नसोहळ्यात धवलारीण प्रसंगानुरूप ‘धवले’ गाते. मांडव स्थापणीच्या विधीपासून सुरू झालेला हा श्राव्य प्रवास लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच्या देवोत्थानापर्यंत कायम राहतो. विवाह विधींमधील लहान लहान गोष्टींचे बारकाईने आणि रसभरित वर्णन या गीतांमधून होत राहते. दगडी पाटा, मालटा नावाचा दगडी दिवा यांची जागा निश्चित करताना
“घाटावरशी आला पाथरवटू, आधी लावला पाट्याचा कामू हो,
आधी घरविली पाट्याची पाठू हो, मग घरविला पाट्याचा पोटु हो!” अशा ओळी येत राहतात. हळदी समारंभाच्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या घाऱ्या-पापड्या यांसाठीही स्वतंत्र गीतरचना आहे. वधूला-वराला हळद लावताना, तेल, उटणे लावतानाही वर्णन केले जाते. या प्रत्येक धवल्यांमध्ये प्रसंगानुरूप नातेवाईकांची नावे समाविष्ट करणे हे देखिल कौशल्याचे काम. पण या सगळ्यांवर मात करत कधी थट्टा मस्करी करत तर कधी रागाराग करत धवरालीण आपली कामगिरी चोख बजावते.
बऱ्याचदा पतीचे निधन झालेल्या महिलांना सामाजिक जीवनात (तथाकथित) शुभ व मंगल कार्यात नाकारले जाते; मात्र धवलारीणीच्या बाबतीत हा भेदभाव चालत नाही. तिच्या हातून सर्व मंगल विधी पार पाडले जातात.
या कामासाठी एक साडी, नातेवाईकांचे नाव घेतल्यानंतर मिळणारे चार दोन रुपये आणि घारी-पापडी इतकीच बिदागी मिळायची. पण अलिकडच्या काळात धवलारीण मिळणे कठीण झाल्याने या कामासाठी मिळणाऱ्या मानधनात घसघशीत वाढ झाली आहे.सध्या उच्चशिक्षित महिलाही आवड म्हणून धवला गीत गाऊ लागल्याने समाजातील लुप्त होण्याच्या मार्गावर असणाऱ्या या गीतांना चांगले दिवस आले आहेत. धवलगीतांचे योग्य रितीने दस्ताऐवजीकरण करणे आणि या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देणे गरजेचे आहे.
-- तुषार म्हात्रे
Comments