गठलीचा ‘जंपिंग जॅक’
अलिकडच्या काळात शहरांमध्ये आनंदमेळा किंवा तत्सम नावाने भरणारे महोत्सव सतत होतच असतात. या महोत्सवांमध्ये लहान मुलांसाठी खास ‘जंपिंग जॅक’ची योजना केलेली असते. यात या मुलांना ठराविक शुल्क भरून ठराविक काळापुरत्या हव्या तशा उड्या मारता येतात. हातात कमी वेळ आणि अधिक पैसा असण्याच्या या काळात विकतच्या उड्या असणे स्वाभाविकच आहे. अर्थात विकतच्या उड्यांचे हे चित्र सर्वत्र सारखे नाही. नवी मुंबई परिसराला शहरी झगमगाट येण्यापूर्वी इथल्या खारोपाटात चांगलाच जिवंतपणा होता. इथल्या भातशेतीमुळे शेतीपुरक व्यवसाय चांगलेच तेजीत असायचे. अशाच व्यवसायांपैकी एका अनोख्या व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या लेकरांना फुकटात ‘जंपिंग जॅक’चा अनुभव मिळायचा.पेंढ्याच्या राशींच्या मोठ्या डोंगरावर वखार मालकाची नजर चुकवून उड्या मारणे हा गावातील लहान मुलांचा आवडीचा छंद. शेती आणि पशुपालन या दोन आदिम परंपरांशी संबंधित या व्यवसायाचे नाव ‘गठडी व्यवसाय’. बऱ्याच ठिकाणी त्याला ‘गठली’, ‘पावळी’ असेही म्हणतात.
रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात भातशेतीबरोबरच माळरानातील शेतामध्ये नैसर्गिक गवतही मोठ्या प्रमाणात उगवत असते. पूर्वीच्या काळापासूनच शेतकरी, शेतमजूर हे गवत व त्याच बरोबर भातझोडणी करून राहत असलेल्या पेंढ्याची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असतात. भातकापणी होऊन शेतं मोकळी झाली की या मोकळ्या जागांवर गठडीच्या वखारी सुरू होतात. पाऊस लांबला की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत थांबावे लागते. या वखारींचे दलाल परिसरातल्या गावांमध्ये फिरून पेंढा विक्रीचे आवाहन करतात. भाताचा पेंढा एकत्र बांधला जातो, त्याला गुंडी म्हणतात. अशा लहान लहान गुंड्या एकत्र करून एक मोठा ‘वझा’ (ओझा) बनवला जातो. ही सर्व ओझी आणून कोणाच्या तरी जागेत भाड्याने उभ्या केलेल्या वखारीत जमा होत जातात. या पेंढ्याला वजना प्रमाणे योग्य तो भाव दिला जातो. (खरंतर या पेंढ्याला मिळणारे पैसे पाहता, त्याला ‘अयोग्य भाव’ म्हणनेच ‘योग्य' ठरेल!)
या वखारीत आलेल्या पेंढ्याला प्रेस यंत्राद्वारे तारेच्या साहाय्याने सहा ते सात टनाच्या गठड्या बनवल्या जातात.
सध्याच्या काळात प्रेसमशीन वापरली जात असली तरी कित्येक वर्षे याकामासाठी बैल, रेडा यांच्या प्राणीशक्तीचाच वापर होत होता. तेलाच्या घाण्याप्रमाणे कार्यप्रणाली असणाऱ्या या यंत्राला बैल किंवा रेडा जुंपला जायचा. वर्तुळाकार दिशेने हे प्राणी फिरू लागले की एखाद्या लिफ्टप्रमाणे यंत्राची फळी वर उचलली जाते. या रचनेत टाकलेला पेंढा घट्ट चेपला जाऊन त्याची अत्यंत कडक गठडी बनते. या पेंढ्याच्या गठडीला घट्ट तारेने बांधून ठेवली जात असे. अजूनही गठडी अशाच प्रणालीवर चालते, मात्र प्राण्यांची जागा इतर यंत्रांनी घेतली आहे.
वखारीमध्ये व गवत रचण्यासाठी व प्रेसमध्ये गठड्या रचण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. एका वखारीत ५० मजुरांना रोजगार मिळत असतो. अजूनही पालघर जिल्ह्यातील काही भागात वखारी चालू असून सुमारे हजारभर मजुरांना या वखारीद्वारे रोजगार मिळत आहे.
त्याचप्रमाणे पेंढ्याची ने-आण करण्यासाठी बैलगाडीचा उपयोग केला जातो. या बैलगाडीमध्ये पेंढा आणण्यासाठी एका फेरीला दीडशे ते दोनशे रुपये भाडे वखारी मालक देत असतात. त्यामुळे बैलगाडीवाले भाड्याच्या रूपात दिवसाकाठी चार ते पाच फेऱ्यांमध्ये आठशे ते एक हजार रुपये मिळवतात. इथल्या वखारींमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे.
या गठड्या वखार मालक मुंबई, वसई, नालासोपारा, ठाणे, गोरेगाव आदी भागांतील दूध व्यवसाय करणाऱ्या तबेल्यांना विक्री करतात. पावसाळ्यात या गठड्यांना मोठी मागणी व योग्य भाव मिळतो. या पूर्वी आदिवासी विकास महामंडळाने गवत -पेंढा एकाधिकार पद्धतीने खरेदी केली होती, परंतु त्यांना त्यामध्ये योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ही खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. आता खासगी व्यापारी हा व्यवसाय करीत आहेत.
कधी पाऊस लांबला तर कापणीला आलेल्या भातशेतीचे नुकसान होते. अशा वेळी बरेचसे शेतकरी ओला पेंढा न बांधता तसाच फेकून देतात. अशा वेळेस वखारींची संख्या कमी होते.वाढती महागाई, शेती अवजारे, खते, बियाणे यांचे वाढते भाव तसेच मजुरांची मजुरीही वाढली आहे. त्यामुळे भातशेतीला खर्च जास्त येतो,मात्र भाताला योग्य भाव मिळत नाही. या कारणांमुळे एकेकाळी गुंड्यांसारखा पसरलेला हा व्यवसाय गठलीसारखा आक्रसून गेलाय. विकासाच्या प्रेस मशीनमध्ये शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चेपले गेलेत.
सोबत चेपली गेली आहे या व्यवसायांवर अवलंबून असणारी लोकसंख्या. पूर्वीच्या काळातल्या हे ‘जंपिंग जॅक’ पुन्हा एकदा गजबजून जावेत, हीच अपेक्षा.
-- तुषार म्हात्रे
Comments