धवलारीण

शेती व्यवसायाशी संबंधित सर्वच समाजांमध्ये सण, समारंभ साजरा करण्याचा दिवस, एकूण कालावधी शेतीकामांतून मिळणारी उसंत, उत्पादन यांवर अवलंबून असतो. भातशेती करणाऱ्या समाजाला कापणी, मळणीनंतर बऱ्यापैकी आराम मिळतो. बहुदा या कारणांमुळेच तुलसीविवाहानंतर विवाहोत्सुक उमेदवारांची लग्नकार्ये उरकली जातात. वधू, वर आणि घरच्यांची संमती या तीन घटकांचे एकमत झाले की पुढची तयारी सुरू होते. विवाहाचा अंदाजे दिवस ठरवताना आणखी एक महत्वाची बाब पाहीली जाते, ती म्हणजे या तारखेला विवाह सोहळा पार पाडण्यासाठी आवश्यक गोष्टींची उपलब्धता. यात लग्नाचा हॉल, मांडव, वाजंत्री, पुरोहीत, आचारी हे सर्व उपलब्ध होतील याची खात्री केली जाते. खारेपाटातल्या आगरी, कोळी समाजात मात्र, या सर्वांसह आणखा एका बाबीची खातरजमा केली ती म्हणजे, ‘धवलारीण उपलब्ध आहे का? धवलारीण पारंपरिक पद्धतीने लग्नातील वेगवेगळ्या विधी पार पाडत असते, त्यामुळे तिच्याशिवाय लग्नसोहळा पार पडणे अशक्यच. एखाद्या पुरोहिताप्रमाणेच काम बजावणारी ‘धवलारीण‘ म्हणजे तरी नेमकं काय? याचं एका वाक्यात उत्तर म्हणजे “धवले गाते ती धवलारीण!” अशा वेळी पुन्हा प्रश्न येईल की, ‘धवले म्हणजे क...