मोतियाने द्यावी भरून

           मेगॅस्थेनिस हा ‘सेल्युकस निकेटर’ आणि ‘चंद्रगुप्त मौर्यां’च्या दरबारातील एक राजदूत. याने भारतातील आपल्या वास्तव्याबाबत ‘इंडिका’ हा ग्रंथ लिहीला. या ग्रंथात तो एकेठिकाणी म्हणतो की, “भारतात सोन्यापेक्षाही मोत्याला अधिक किंमत आहे.” अर्थात भारतीयांच्या दृष्टीने मोत्यांचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे. प्राचीन भारतीय वाङ्‌मयात मोत्यांचा उल्लेख आढळतो. अथर्ववेदात देवांच्या अस्थिपासून मोती होतात, असे म्हटले आहे. पुढे वराहमिहीराच्या बृहत्संहिता या संस्कृत ग्रंथात ‘मुक्ताफल’ परीक्षा या प्रकरणात मोत्यांविषयी बरेच लिहिले आहे.

       तसे पाहता रत्नशास्त्रानुसार मोती हे एक प्राणिज रत्न आहे. नावाप्रमाणेच ते भूगर्भात वगैरे न मिळता थेट शिंपल्याच्या शरीरातच सापडते. अन्न म्हणून शिंपले पकडताना बहुदा या चमकदार आणि आकर्षक रत्नाचा शोध मानवाला लागला असावा. पण त्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर मोती मिळवण्याच्या उद्देशानेच ही कालवे गोळा केली जाऊ लागली.

जगभरात मोती तयार करणारी कालवे खाऱ्या तसेच गोड्या पाण्यातही आढळतात. पण भारतात मात्र गोड्या पाण्यातील कालवांपासून मोती मिळाल्याचे फारसे आढळलेले नाही. भारतातील मोत्यांच्या कालवांची मुख्य केंद्रे हिंदी महासागराजवळील मन्नारचे आखात आणि पाल्कची सामुद्रधुनी ही आहेत. तर पश्चिमेकडील कच्छच्या आखातातही मोत्यांची कालवे आढळतात. कालवांची मच्छीमारी त्या त्या राज्य शासनाच्या कक्षेत येते व यासंबंधीचे कायदे, उद्योग, निर्यात वगैरे त्या शासनामार्फत होते. कच्छ आणि सौराष्ट्रात आढळणारी कालवे बऱ्याचदा ओहोटीच्या वेळी हाताने गोळा केली जातात. पण मोत्यांची शोधयात्रा सर्वत्रच इतकी सोप्पी नाही.लहान कालवे पकडण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. पूर्वीच्या काळीसुद्धा महाराष्ट्रात मोत्याची कालवे सहजतेने मिळत नव्हती. पण अलीकडे रत्नागिरीजवळ ती थोडी आढळली आहेत. उत्तर कोकणच्या किनारपट्टीवर मोती मिळवण्यासाठी पूर्वापार बुडी पद्धतीने कालवे काढली जातात. यात जोडीजोडीने काम करणारे, तसेच एकेकट्याने काम करणारे असे दोन्ही प्रकार आहेत. मोत्यांच्या कालव्यांसाठी जोडीने काम करताना होडीतून समुद्रात दोन दोर सोडले जातात त्यांपैकी एका दोराला  वजनदार दगड बांधलेला असतो. एकजण हा दगड बांधलेला  दोर धरून बुडी मारतो. त्याच्या हातात समुद्रतळावरील कालवे भरण्यासाठी एक टोपली असते. दुसऱ्या दोरीचा उपयोग तो वर असलेल्या साथीदारास संदेश देण्याकरिता करतो. हा बुड्या पाण्याखाली एक ते दीड मिनिटे राहू शकतो. खालून दोर हलवला की त्याला वर काढले जाते.

 नवी मुंबई, रायगड परिसरातील पाणबुडे धाडसी आहेत. सहसा ते एकेकट्याने काम करतात. पाण्यात बुडी मारताना ते दोरीला दगड बांधीत नाहीत. दीर्घ श्वास घेऊन समुद्राचा उथळ तळ गाठतात. खाडी किनाऱ्यावरील गढूळ पाण्यातील शिंपले शोधणे हे काम अवघडच. रेती उपसणाऱ्या बुड्यांप्रमाणेच हा व्यवसाय देखील जोखमीचा. वारंवार खोल पाण्याच बुडी मारल्याने आरोग्यावर होणारे परिणामही तितकेच गंभीर.पाण्याखालील कामाचा दीर्घकालीन परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो. सतत पाण्याखाली काम केल्याने ऐकू न येणे, उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होण्याची शक्यता असते.ग पण हातपाटीच्या कामगारांना किमान आपल्या पाटीतील रेतीची खात्री तरी असते. इथे मोत्यांसाठी कालवे भरून आणणाऱ्यांना ‘झाकला शिंपला, किती लाखाचा?’ हेच ठाऊक नसते. ह्यांची ‘समुद्र वारी, मोतीयाने द्यावी भरून’ अशीच अपेक्षा असते, पण बऱ्याचदा ‘देवा मी जातो दुरून’ म्हणत नशिब त्यांच्यापासून लांब पळते. हाती लागलेल्या शिंपल्यातील मोती मिळवणे हेे सुद्धा जिकीरीचे काम असते. प्रत्येक शिंपल्याला तपासून त्यातले मोती बाहेर काढून स्वच्छ करून वाळवला जातो. हे मोती विकून काही पैसे मिळवता येतात. याचबरोबर काही ठिकाणी मोत्यांऐवजी फक्त कालवे विकूनही पैसे मिळवता येतात. प्राप्त झालेल्या मोत्याची परीक्षा केली जाते. मोती खरे व चांगले आहेत की नाहीत हे ओळखण्यासाठी ढोबळ पद्धत म्हणजे ते आपल्या पुढच्या दातावर घासले असता खडबडीत लागले, तर खरे व गुळगुळीत लागले, तर खोटे असेही मानले जाते. अलिकडच्या काळात निरनिराळ्या शास्त्रीय पद्धतींनी ही तपासणी केली जाते.अत्याधुनिक उपकरणांच्या साह्याने मोत्याचा आतील गाभा तपासता येतो. एन्डोस्कोप या उपकरणाच्या साह्याने मोत्यास पाडलेल्या छिद्राची तपासणी करता येते. मोत्यास छिद्र पाडण्यापूर्वी क्ष-किरणांच्या साह्याने हे थर कसे आहेत, हे समजू शकते. 

    मोती उत्पादनाच्या दृष्टीने खाऱ्या पाण्यात राहणारी आणि नैसर्गिक मोती उत्पादन करणारी कालवे ‘मेलिॲग्रिना (पिंक्टाडा)’ या प्रजातीची आहेत.  मेलिॲग्रिना प्रजातीची कालवे सर्वांत मौल्यवान व सुंदर मोती उत्पादन करतात. 

दुर्दैवाने मुंबई परिसरात आढळणारी कालवे ‘प्लॅकुना प्लॅसेंटा’ या प्रजातीची आहेत. यांत आढळणारे मोती अगदी निकृष्ट दर्जाचे असतात त्यांना चांगली किंमत मिळत नाही. त्यामुळे अलिकडे उत्तर कोकणातला या व्यवसायाची चमक हरवली आहे. अर्थात या मोत्यांचा आयुर्वेदीय औषधांकरिता होणारा उपयोग ही यातील जमेची बाजू आहे. पश्चिम किनारपट्टीवर शिंपल्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक परिसर उपलब्ध आहे आणि अलिकडे अत्याधुनिक पद्धतीने संवर्धित मोती (Cultured) तयार करणे शक्य झाले आहे. या व्यवसायातील जोखिम कमी करून दर्जेदार उत्पन्न मिळविण्यासाठीचे संशोधन आणि तशी इच्छा धोरणकर्त्यांनी केल्यास या कोकणच्या सुवर्णभूमीत मोत्यांचे पीक नक्कीच येऊ शकेल.

-- तुषार म्हात्रे

Comments

Popular posts from this blog

पाचवीला पुजलेली सटी

चुलीवरचे जेवण!

शिलाखंडांचे ताम्रपट