रयत: शतकानंतरची पहाट

रयत: शतकानंतरची पहाट दिवस होता विजयादशमीचा. एकोणिसशे एकोणिस सालातल्या ऑक्टोबरच्या चार तारखेचा प्रसंग. भाऊराव पायगौंडा पाटील नावाच्या कर्मवीराने कराड तालुक्यातील काले गावात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ही घोषणा सर्वसामान्य रयतेला उत्कर्षाची संधी मिळवून देणारी ठरली. ही घोषणा होती रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची. स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळात बहुजनांसाठी, ग्रामीण भागातील जनतेला सुशिक्षित करण्याचे काम या संस्थेने केले. स्वत:च्या मालकीची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यास 'रयत' म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेला 'रयत' म्हणून संबोधित. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेचे नाव 'रयत शिक्षण संस्था' असणे स्वाभाविकच होते. अथांग विस्तारणारा व दीर्घायुष्य लाभलेला वटवृक्ष या संस्थेचे बोधचिन्ह आहे. आजघडीला जवळपास साडेचार लाख विद्यार्थी या वटवृक्षाच्या छायेत अध्ययन करत आहेत. सातशेहून अधिक शाखा आणि सुमारे सोळा हजार कर्मचारी वर्ग यामुळे ही संस्था आशिया खंडात विस्ताराने सर्वात मोठी शिक्षणसंस...