पिंडीरुपातील स्मृतीचिन्हे

पिंडीरुपातील स्मृतीचिन्हे महान कार्य करणाऱ्या विभूतींची स्मारके सर्वत्रच उभारली जातात. आपल्या देशात अगदी प्राचीन काळापासून स्मारकांची परंपरा आहे. विशिष्ट प्रकारच्या स्मृतींना दृश्य रुप देण्याच्या प्रयत्नातून ही पद्धत सुरू झाली असल्याचे सांगण्यात येते. प्रदेशानुसार त्याचे स्वरूप जरी बदलत असले तरी आपल्या प्रियजनांची आठवण टिकवून ठेवणे ही भावना सर्वत्र सारखीच आहे. रायगड जिल्ह्यात स्तंभ, देवळी, छत्री, तुळशीवृंदावन, वीरगळ, सतीशिळा अशा स्वरूपातील स्मारके आढळतात. महाराष्ट्रात ज्या छत्री आढळतात, त्यातील बहुसंख्य मराठ्यांच्या काळातील आहेत. स्मारक, समाधींचे उन, वारा, पाऊस यांपासून रक्षण करण्यासाठी उभारलेली मेघ-डंबरी हा छत्रीचाच प्रकार. जिल्ह्यातील रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरील छत्री, पाचाडला राजमाता जिजाबाईंची छत्री आणि अलिबाग येथील कान्होजी आंग्रे यांची छत्री संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाच्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणच्या घुमटीवजा देवळीही प्रसिद्ध आहेत. या स्मारकांसह आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार रायगड परिसरात पहायला मिळतो. ...