दिन दिन दिवाळी!

दिवाळीवर प्रभाव कृषी संस्कृतीचा! ( मुंबई सकाळ, रायगड टुडे 26 ऑक्टोबर 2019 ) आपल्या संस्कृतीला ‘सण-कृती’ म्हणावे लागेल इतक्या मोठ्या संख्येने विविध प्रकारचे सण, उत्सव शहरी आणि ग्रामीण भागात सातत्याने साजरे होत असतात. कधी आवड आहे म्हणून, तर कधी सवड आहे म्हणून आपला समाज रोजची चाकोरी सोडून या सणांमध्ये सहभागी होत असतो. दिवाळी देखील या सणांपैकीच एक. सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या दिवाळी सणावर रायगडच्या ग्रामीण भागात मात्र इथल्या कृषिसंस्कृतीचा मोठा प्रभाव जाणवतो. मुलांच्या हातात फुलबाजी आली की ती गोलगोल फिरवत ‘दिन दिन दिवाळी’ हे गाणे आपसूकच तोंडावर येते. “दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा दे माई खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालीन काठी...” परंपरेने चालत आलेले हे गाणे ग्रामीण कृषीसंस्कृतीतील आहे. रायगड जिल्ह्यात पूर्वी गावाकडे घराघरातले गोवारी म्हणजेच गुराखी आपापली गुरे-ढोरे घेऊन रानात जायचे. तिथे त्या गुरांना वाघ, बिबटे यांचे भय असायचे आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून हे...